सिस्टिमला विद्यार्थी नव्हे, अंधभक्त हवेत; राहुल गांधींचा इंदूरमधून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल
मध्य प्रदेशमध्ये इंदूरमध्ये शनिवारी 'छात्रो की गूंज' कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातून राहुल गांधींनी मोदी सरकरवर जोरदार टीका केली.

मध्य प्रदेशमध्ये इंदूरमध्ये शनिवारी ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात काँग्रेस खासदार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, पेपर फुटी (Paper Leak), नोकरी भरतीवर भाष्य केलं. व्यवस्थेला विद्यार्थी नव्हे, तर अंधभक्त हवेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. अभ्यासू विद्यार्थी व्यवस्थेला प्रश्न करतो, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले, विद्यार्थी कोणतीही गोष्ट ही वरिष्ठांनी सांगितले म्हणून स्वीकारत नाही. एखाद्या व्यक्तीला संस्थेत जबाबदारी कशी मिळाली, यावरून सवाल उपस्थित करतात. त्यानंतर त्यांनी क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमित शहा यांचा मुलगा कसा झाला, असा सवाल त्यांनी केला. गुणवत्ता आणि पात्रतेवरून विद्यार्थ्यांनी सवाल उपस्थित केले पाहिजे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले. भारतातील संस्था व्यवस्थित काम का करत नाही, यावरून विद्यार्थी प्रश्न विचारतात. प्रश्न विचारल्याने ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. विद्यार्थी हे कोही गोष्ट डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी समजून घेण्यावर भर देतात, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.
…म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम – राहुल गांधी
राहुल गांधी यांनी यावेळी विद्यार्थी आणि अंधभक्त यातील फरक समजावून सांगितला. विद्यार्थी हा जिज्ञासू असतो. जिज्ञासू विद्यार्थी हा प्रश्न विचारतो. नवीन माहिती मिळाल्यावर त्यावर चिंतन करतो. तर अंधभक्त हे अशा विचारसणीमुळे प्रश्न विचारणे टाळतात. यावेळी राहुल गांधी यांनी द्वेष, गर्व आणि भीतीचा उल्लेख केला. विद्यार्थिनींचा आदर करतो म्हणत अंधभक्ती सारख्या विचारामुळे महिलांचा अपमान केला जाऊ शकतो. राहुल गांधी पुढे म्हणाले, शिक्षण उपकार नसून प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. शाळा ते महाविद्यालय, विद्यापीठ ते रोजगार अशी संपूर्ण साखळी मजबूत केली पाहिज, असे त्यांनी सांगितले. गांधी यांनी भाषणात पुढे शिष्यवृत्ती, शिक्षकांची रिक्त पदे या मुद्द्यांवर देखील भाष्य केलं. यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणावर परिणाम होत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.