Rahul Gandhi ED Inquiry : 20 जूनपर्यंत चौकशी नको, राहुल गांधींची ईडीकडे विनंती; सलग 4 दिवस चौकशीमुळे देशभरात काँग्रेसचं आंदोलन

| Updated on: Jun 16, 2022 | 6:33 PM

राहुल गांधी यांनी ईडीकडे चौकशीपासून काहीसा दिलासा देण्याची विनंती केल्याची माहिती मिळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी 20 जूनपर्यंत चौकशी नको, अशी विनंती केली आहे. राहुल गांधी यांची सोमवारपासून ईडीकडून चौकशी केली जातेय.

Rahul Gandhi ED Inquiry : 20 जूनपर्यंत चौकशी नको, राहुल गांधींची ईडीकडे विनंती; सलग 4 दिवस चौकशीमुळे देशभरात काँग्रेसचं आंदोलन
Follow us on

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) अंमलबजावणी संचलनालयाकडून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची चौकशी सुरु आहे. सलग चार दिवसांपासून ही चौकशी सुरु आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून देशभरात आक्रमक भूमिका घेतलीय. देशातील विविध राज्यात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. अशावेळी राहुल गांधी यांनी ईडीकडे चौकशीपासून (ED Inquiry) काहीसा दिलासा देण्याची विनंती केल्याची माहिती मिळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी 20 जूनपर्यंत चौकशी नको, अशी विनंती केली आहे. राहुल गांधी यांची सोमवारपासून ईडीकडून चौकशी केली जातेय. सकाळी चौकशीला बोलावून घेतलं जातं. दिवसभर चौकशीनंतर रात्री राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडतात. असं मागील चार दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे ईडी आता राहुल गांधींची विनंती मान्य करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राहुल गांधी यांनी चौकशीपासून सवलत देण्याची विनंती करणारं एक पत्र ईडीला लिहिलं आहे. या पत्रात राहुल गांधी यांनी चौकशीपासून सवलत देण्याची विनंती करताना आईच्या आजाराचं कारण दिलं आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना जूनच्या सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा दुसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातच प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीकडून सोनिया गांधी यांचीही चौकशी केली जाणार आहे. 23 जून रोजी ईडीने सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी बोलावलं आहे.

काँग्रेस नेते कार्यकर्त्यांचं देशभरात आंदोलन

राहुल गांधी यांची सलग चार दिवसांपासून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे काँग्रेसने अधिक आक्रमक पवित्रा घेतलाय. दिल्लीसह देशभरात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी दिल्ली पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही पाहायला मिळाला. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या मुख्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केलाय. दरम्यान, पोलिकांकडून माकन यांचा आरोप फेटाळण्यात आला.

महाराष्ट्रात काँग्रेस नेते रस्त्यावर उतरले

राहुल गांधींची चौकशी केवळ दबावतंत्राचे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. या चौकशीविरोधात आज राज्यभरात काँग्रेसकडून मोर्चे काढले. केंद्रातील भाजपा सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुलजी गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही, केंद्र सरकारविरोधात आमचा संघर्ष सुरुच राहिल असा इशारा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.