Video: राजीव सातवांचं काय वय होतं ह्या जगातून जाण्याचं? आरजेडीच्या खासदारांचं देशभर चर्चेत असलेलं भाषण ऐकलंत?

| Updated on: Jul 21, 2021 | 11:51 PM

फोन करणाऱ्याला वाटायचं, खासदार आहे, ऑक्सिजन मिळवून देईल. शंभर फोन व्हायचे. रात्री तपासायचो तर सक्सेस रेट दोन, सक्सेस रेट तीन, सांगा, मला कोणता आकडा कोण सांगणार? आम्हाला कोणताच आकडा नकोय. जे लोक गेले, ते जीवंत पुरावा सोडून गेले. हे आमचं सामुहिक अपयश आहे.

Video: राजीव सातवांचं काय वय होतं ह्या जगातून जाण्याचं? आरजेडीच्या खासदारांचं देशभर चर्चेत असलेलं भाषण ऐकलंत?
The Manoj Jha speech in RS being discussed in country
Follow us on

काही भाषणं इतिहास निर्माण करतात किंवा ते ऐतिहासिक ठरतात. असच एक भाषण सध्या चर्चेत आहे. फेसबूक असो की ट्विटर
किंवा इतर सोशल माध्यमं. सगळीकडे हे भाषण बऱ्यापैकी व्हायरल झालंय. हे भाषण आहे राज्यसभा खासदार मनोज झा यांचं.
ते राज्यसभेवर आरजेडीचे खासदार आहेत. खासदार झाल्यानंतरही त्यांनी प्राध्यापकी सोडलेली नाही. ज्यावेळेसही ते सभागृहात
भाषणाला उभे असतात त्यावेळेस सभागृह तर त्यांना ऐकतच पण देशही ऐकतो. कारण ते पोटतिडकीनं बोलतात, पक्षीय गणितं
बाजूला ठेवतात. राजकारण शक्यतो येणार नाही याची काळजी घेतात.

देशभरातल्या राज्य सरकारांनी ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद केंद्र सरकारकडे केलीय. तीच माहिती
मोदी सरकारच्या वतीनं संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितली गेली. त्यावरुन सध्या गदारोळ उठलाय. कोरोनाच्या दुसऱ्या
लाटे दरम्यान शेकडो जणांचा जीव ऑक्सिजन अभावी झाल्याचं माध्यमांनीच बातम्या दिल्यात. लोकप्रतिनिधींनीही त्या मांडल्यात.
पण जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती सरकारनं सभागृहात दिलीय. याच
गोष्टीवर बोट ठेवत खासदार मनोज झा यांनी राज्य सरकारं आणि केंद्र सरकार दोन्हींचेही अक्षरश: वाभाडे काढलेत.

एक सामुहिक माफीनामा हवा
मनोज झा यांचं भाषण उणं पुरं आठ एक मिनिटांचं आहे. त्यात त्यांनी दिवंगत खासदार राजीव सात यांचा भाषणाच्या सुरुवातीलाच
उल्लेख केला. झा म्हणाले, माझं भाषण असं काही नाही. शोकात असलेल्या लोकशाही देशाच्या नागरिकाचं हवं तर हे बोलणं समजा.
त्याच्यावतीने काही गोष्टी बोलल्या जातायत. त्या लोकांना माझा आधी माफीनामा देतो ज्यांच्या मृत्यूलाही आम्ही मान्यता देत नाहीयोत.
हा माफीनामा सर फक्त माझा नाहीय. मे महिन्यात मी सहा आर्टीकल लिहिली. संसद चालू नव्हती. कुठे माझी तक्रार घेऊन जाऊ,
कुणाला सांगू शकलो असतो. मला माझ्या भाजपाच्या मित्रांनी, साथींनी कॉल केला. माझं अभिनंदन केलं. मी त्यांचेही आभार मानतो.
आणि सांगू इच्छितो की, एक सामुहिक माफीनामा ह्या सभागृहानं त्या जीवांना पाठवावा ज्यांची प्रेतं गंगेच्या पाण्यावर तरंगत होती.
कुणी हे म्हणतं, कुणी ते म्हणतंय.

राजीव सातवांचं जायचं वय होतं का?
सर दुसरी एक गोष्ट, मी काल सेक्रेटरी जनरलशी बोललो. त्यांच्याकडून कळालं की, कुठल्याच दोन अधिवेशनाच्या दरम्यान
50 खासदारांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच आली नाही. संसदेच्या इतिहासात नाही. राजीव सातव यांचं काय वय होतं ह्या
जगातून जाण्याचं? रघूनाथ महापात्रा, जेव्हा कधी भेटायचे तेव्हा गळ्याला पडायचे, म्हणायचे जय जगन्नाथ. हे दु:ख वैयक्तिक आहे,
मी आकडा सांगणार नाही. माझा आकडा, तुमचा आकडा, स्वत:च्या दु:खात तो आकडा शोधा. एक व्यक्ती नाही ह्या देशात, ह्या
सभागृहात, सभागृहाच्या बाहेर ज्यानं स्वत:च्या ओळखीतल्या कुणाला गमावलं नसेल. ऑक्सिजनसाठी लोक फोन करायचे.
आम्हाला सोय करता यायची नाही. फोन करणाऱ्याला वाटायचं, खासदार आहे, ऑक्सिजन मिळवून देईल. शंभर फोन व्हायचे.
रात्री तपासायचो तर सक्सेस रेट दोन, सक्सेस रेट तीन, सांगा, मला कोणता आकडा कोण सांगणार? आम्हाला कोणताच आकडा
नकोय. जे लोक गेले, ते जीवंत पुरावा सोडून गेले. हे आमचं सामुहिक अपयश आहे. सगळ्या सरकारांचं. काय बनवलं आम्ही.

(RJD mp manoj jha rs speech rajiv satav which is being discussed all over the country)