EXCLUSIVE | दोस्ती होण्याआधीच तुटली? काँग्रेसच्या नेमकं मनात काय? पडद्यामागच्या घडामोडींकडे देशाचं लक्ष

| Updated on: Jun 01, 2023 | 5:16 PM

देशाच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. या दरम्यान विरोधी पक्षांच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

EXCLUSIVE | दोस्ती होण्याआधीच तुटली? काँग्रेसच्या नेमकं मनात काय? पडद्यामागच्या घडामोडींकडे देशाचं लक्ष
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या बैठकीला काँग्रेस हजर राहणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. पण काँग्रेस या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. विरोधकांची एक मोट बांधण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक लाट उभी करण्यासाठी विरोधी पक्षाकडून तयारी केली जातेय. त्यासाठीच नितीश कुमार यांनी 12 जूनला पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. पण काँग्रेस या बैठकीला राहणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

देशातील विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत

देशाच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. कारण देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. देशात गेल्या 9 वर्षांपासून भाजपचं सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. पण या गेल्या 9 वर्षांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. भाजपची अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत युती आहे. गेल्या 9 वर्षांच्या काळात अनेक प्रादेशिक पक्षांसोबत भाजपचं बिनसलं. त्यामुळे त्याचं मैत्रीचं रुपांतर राजकीय शत्रूत्वात झालं. या दरम्यानच्या काळात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागलं. त्यामुळे देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.

विरोधी पक्षांच्या मनात मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड संताप आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चांगलाच संघर्ष बघायला मिळाला. त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यात कमी-अधिक प्रमाणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष बघायला मिळाला. दिल्लीतही तसंच काहीसं चित्र आहे. तर दक्षिणेकडील प्रादेशिक पक्षांना देखील भाजपचं जास्त वर्चस्व नकोय. त्यामुळे ते सुद्धा भाजप विरोधात एकत्र येण्यास तयार आहेत. त्यातूनच विरोधी पक्षांनी एकत्र यावं, अशी भावना विरोधकांमध्ये निर्माण झालीय.

विरोधकांच्या आघाडीच्या नेतृत्वावरुन मतभेद?

विशेष म्हणजे देशभरातील सर्व विरोधक यासाठी सकारात्मक देखील आहेत. पण विरोधकांच्या याआघाडीचं नेतृत्व कोणी करावं, यावरुन मतभेद असल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची काँग्रेस शिवाय ही आघाडी हवी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसशिवाय आघाडी करता येणार नाही, असं आधीच स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी विरोधी पक्षाच्या या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसने करु नये, असं ममता बॅनर्जी यांचं स्पष्ट मत आहे.

काँग्रेसचा अंतिम निर्णय काय असेल?

येत्या 12 जूनला पाटण्यात होणाऱ्या बैठकीला ममता बॅनर्जी देखील हजर राहणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून कोणीही हजर राहणार नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही दिग्गज नेते बैठकीला हजर राहतील, अशी माहिती मिळत होती. पण आता काँग्रेसचे नेते या बैठकीला हजर राहणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असं असलं तरी शरद पवार यासाठी काही प्रयत्न करतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.