धक्कादायक! ज्याची भीती तेच घडलं, अमेरिकेत अपहरण झालेल्या 4 भारतवंशियांचा…

| Updated on: Oct 06, 2022 | 11:27 AM

अमेरिकेत कॅलिफोर्नियातून तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या भारतीयांबाबत वाईट बातमी आहे. अपहृत चारही भारतवंशियांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय.

धक्कादायक! ज्याची भीती तेच घडलं, अमेरिकेत अपहरण झालेल्या 4 भारतवंशियांचा...
Image Credit source: social media
Follow us on

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात (California) तीन दिवसांपूर्वी एका भारतवंशिय (Indian Family) कुटुंबाचं अपहरण झालं होतं. यातील चौघांचेही मृतदेह पोलिसांना आढळून आलेत. गंभीर बाब म्हणजे, यात आठ महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. अपहरणाची (Kidnapping) घटना उघडकीस आल्यानंतर कॅलिफोर्निया पोलिसांनी संशयित हे भयंकर असल्याचं म्हटलं होतं. पोलिसांना जी भीती वाटत होती, तेच अखेर घडलं… अपहरण आणि त्यानंतर हत्याकांडाचं कारण नेमकं काय आहे, याचं गूढ पोलिसांना उलगडलेलं नाहीये.

मर्स्ड काउंटीचे शेरीफ वर्न वार्नके यांनी ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचं म्हटलं. याच भागात पीडितांचे मृतदेह आढळून आले.

चौघांचेही मृतदेह जवळ-जवळ होते. एका शेतकऱ्याने ते पाहिल्यानंतर पोलिसांना ही माहिती दिली.

बुधवारीच मर्स्ड काऊंटी येथील पोलिस अधिकाऱ्यांनी हे कुटुंब किडनॅप होण्या आधीचा एक व्हिडिओ जारी केला होता.

कॅलिफोर्निया पोलिसांनी या प्रकरणी एका 48 वर्षीय इसमाला ताब्यात घेतलं होतं. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.

अमेरिकी गुप्तहेरांना एक माहिती मिळाली होती. मंगळवारी सकाळीच मर्स्ड काउंटी येथील एटवाचर येथे एका पीडिताच्या बँक कार्डचा वापर करण्यात आला.

अपहरण झालेलं हे कुटुंब पंजामधील होशियार पूर जिल्ह्यातील टांडा येथील हरसी गावातील रहिवासी होते. अपहृत व्यक्तींमध्ये 36 वर्षीय जसदीप सिंग, त्यांची पत्नी जसलीन कौर, त्यांची 8 महिन्यांची मुलगी आरुही धेरी आणि 39 वर्षांचे एकजण अमनदीप सिंह या चौघांचा समावेश होता.

बुधवारी पोलिसांनी अपहरणापूर्वीचा व्हिडिओ जारी केला. त्यात जसदीप आणि अमनदीप हे शेकहँड करताना दिसतात. त्यानंतर काही वेळात किडनॅपरने जसलीन आणि 8 वर्षीय आरुहीचं अपहरण केलं. त्यांना बिल्डिंगबाहेरील ट्रकमध्ये नेल्याचं या व्हिडिओत दिसतं.

सोमवारी अमेरिकेतील एका भागात अपहृत अमनदीप सिंह यांचा ट्रक जळालेल्या अवस्थेत सापडला होता. यानंतर अपहरणकर्त्यांनी पुरावे नष्ट केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

अपहरणानंतर पोलिसांनी संशयित हे शस्त्रधारी आणि धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. पण या अपहरण आणि हत्याकांडामागे नेमका काय उद्देश होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण अपहरणकर्त्यांनी कुणालाही खंडणी मागितली नाही.