Supreme Court : बॅलेट पेपरवर मतदानाबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, निवडणुका ईव्हीएम मशिनवरच होणार
वकील एमएल शर्मा यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 100 चा हवाला देऊन बॅलट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया ही एक आवश्यक तरतूद असल्याचे म्हटले होते.
नवी दिल्ली : देशात होणार्या निवडणुकीत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर (Ballot Paper)वर मतदान करण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका (Petition) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकेत कोणतीही योग्यता दिसत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने याचिका फेटाळून लावताना व्यक्त केले आहे. वकील एमएल शर्मा यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 100 चा हवाला देऊन बॅलट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया ही एक आवश्यक तरतूद असल्याचे म्हटले होते. तसेच केंद्रातील मोदी सरकारने लोकप्रतिनिधी कायद्यात योग्य प्रक्रिया न करता कलम 61 जोडले, असेही नमूद केले होते. तथापि, त्यांच्या याचिकेत काहीच तथ्य नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंद्रेश यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाने शर्मा यांची याचिका धुडकावून लावली
अॅड. शर्मा यांनी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम-61 ला आव्हान दिले होते. हे कलम लोकसभा किंवा राज्यसभेत मतदानाने मंजूर झालेले नाही, असा युक्तीवाद त्यांच्या वतीने करण्यात आला. त्यावर खंडपीठाने विचारले की, सभागृहात जे घडते त्याला तुम्ही आव्हान देत आहात का? की सर्वसामान्य जनतेकडून केल्या जाणार्या मतांना आव्हान देत आहात? आपण नेमके कोणत्या प्रक्रियेला आव्हान देत आहात? अशी विचारणा करीत न्यायालयाने शर्मा यांची याचिका धुडकावून लावली आहे. ईव्हीएम मशीनचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. अॅड. मनोहर लाल शर्मा यांनी ईव्हीएम मतदानाविरोधातील याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरद्वारेच घ्याव्यात. आम्ही कायद्याच्या दृष्टीने बोलत आहोत, असे त्यांनी म्हटले होते. (The Supreme Court dismissed the petition regarding ballot paper voting)