‘मला काशीचा प्रसाद मिळाला, पण तिरुपतीच्या प्रकाराने मनाला वेदना’, लाडू वादात आता माजी राष्ट्रपतींची उडी, म्हणाले ही भेसळ म्हणजे तर पाप

Tirupati Temple Laddu Controversy : पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिरुपतीच्या लाडू वादात उडी घेतली आहे. भेसळ हे तर पाप आहे, हिंदू धर्मशास्त्राचा दाखला देत त्यांनी असे वक्तव्य केले आहे. प्रसाद हा भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामध्ये भेसळ करणे निंदनीय असल्याचे ते म्हणाले.

मला काशीचा प्रसाद मिळाला, पण तिरुपतीच्या प्रकाराने मनाला वेदना, लाडू वादात आता माजी राष्ट्रपतींची उडी, म्हणाले ही भेसळ म्हणजे तर पाप
तिरुपती प्रसाद वादात कोविंद यांची उडी
| Updated on: Sep 21, 2024 | 3:43 PM

भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात भेसळ केल्याच्या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. प्रसाद हा श्रद्धेचे प्रतिक आहे. पण त्यात भेसळ होत असल्याचे वृत्त आल्याने भाविक भक्तांच्या मनात शंका उत्पन्न होत आहे. वाराणसी दौऱ्यावर असताना, मी काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन करु शकलो नाही. पण माझ्या काही सहकारी मंदिरात गेले होते आणि त्यांनी माझ्यासाठी आवर्जून प्रसाद आणला. त्याचवेळी माझ्यापर्यंत तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या भेसळीचे वृत्त येऊन धडकले. हा वाद एका मंदिरापूरता मर्यादित नाही. ही प्रत्येक मंदिराची चिंता असल्याचे माजी राष्ट्रपती म्हणाले.

भेसळ हे तर पाप

“भेसळ हे तर पाप आहे. हिंदू धर्मग्रंथात अशा भेसळीला पापच म्हटले आहे. भाविकांसाठी प्रसाद हे श्रद्धेचे प्रतिक आहे. त्यात अशी भेसळ करणे निंदनीय आहे.” माजी राष्ट्रपतींच्या या टिप्पणीमुळे आता हा वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक भाविकांनी प्रसादाच्या तपासाची मागणी केली आहे. तर अनेक देवस्थानांमधील प्रसाद यामुळे रडारवर आला आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी केली चौकशीची मागणी

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी तिरुपती वादावर मत व्यक्त केले आहे. त्यांनी या सर्व प्रकाराची चौकशीची मागणी आंध्र प्रदेश सरकारकडे केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता एक विशेष समिती गठीत करणे आवश्यक आहे. समितीच्या अहवालानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली. हा हिंदूच्या श्रद्धेवर आणि विश्वासावर थेट आघात आहे, तो सहन करण्यात येणार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

दरम्यान तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या वादावरुन राजकारण अधिक तापले आहे. आंध्र प्रदेशमध्ये हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारने पण त्यात हस्तक्षेप केला आहे. सुरुवातीचे काही अहवाल समोर आल्यानंतर देवस्थानचे व्यवस्थापन करणारे सर्वच जण चौकशीच्या फेऱ्यात अडकले. तर तुपाचा पुरवठा करणारी कर्नाटकची कंपनी आणि इतर जण पण चिंतेत आहेत.