राज्यपालांवर कारवाई होणार का?; पंतप्रधान मोदी यांना भेटल्यावर उदयनराजे भोसले म्हणतात…

हा कुठल्या आघाडीचा किंवा कोणत्या पक्षाचा विषय नाही. राजकीय हेतूने त्याकडे पाहू नये. जेवढे शिवभक्त आहेत ते नाराज आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यपालांवर कारवाई होणार का?; पंतप्रधान मोदी यांना भेटल्यावर उदयनराजे भोसले म्हणतात...
उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले
Image Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: | Updated on: Dec 09, 2022 | 11:07 AM

नवी दिल्ली: खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर उदयनराजे यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र दिलं असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यपाल पद हे संवैधानिक पद असल्याने त्या पदावरून हटवण्याबाबतच्या काही प्रक्रिया असतात. त्या पूर्ण करूनच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून कारवाई केली जाते. त्यामुळे राज्यपालांवर कारवाई होईल, अशी मला आशा आहे, असं उदयनराजे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अवमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने होत आहे, असं त्या पत्रात नमूद केलं होतं, अशी माहिती उदयनराजे यांनी दिली.

त्यानंतर राष्ट्रपतींनी ते पत्रं केंद्रीय गृहखात्याला पाठवलं. हा प्रक्रियेचा भाग आहे. आम्हीही प्रक्रियेचा भाग म्हणून मोदींच्या कार्यालयात आज पुन्हा पत्रं दिलं आहे. पंतप्रधानांचं शेड्यूल व्यस्त असल्याने त्यांच्याशी या विषयावर बोलणं झालं नाही. पण त्यांच्या कार्यालयात पत्रं देऊन आम्ही आमच्या भावना कळवल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

कोणत्याही मुद्द्यावर राज्यात तेढ निर्माण होऊ नये ही भावना आहे. शिवाजी महाराज देशाची अस्मिता आहे. त्यांच्याबद्दल बोलताना मोजूनमापून बोलावं. राज्यपाल हे पद मोठं आहे. त्या पदावरील व्यक्तीने कोणत्याही महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलू नये. राज्यपालांच्या विधानामुळे असंतोष पाहायला मिळत आहे. त्यावर तोडगा निघाला पाहिजे. राज्यातील परिस्थिती निवळावी याबाबत पंतप्रधान कार्यालयाला बोललो. आता ते कार्यवाही करतील अशी खात्री आहे, असं ते म्हणाले.

पंतप्रधानांचं शेड्यूल व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना आज भेटायला आलेल्या 26 खासदारांना पूर्णवेळ देता आला नाही. पण त्यांच्या कार्यालयाकडे तक्रार केली आहे. जो काही रिप्लाय येईल त्याची माहिती मीडियाला देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांचा विषय पंतप्रधानांकडे गेलाच असेल. प्रत्येक राज्यात काय चाललं त्याची माहिती पंतप्रधानांकडे असणारच. त्यांना गुप्तवार्ता विभागाकडून माहिती मिळाली असेलच, असं सांगतानाच राज्यपाल हे पद छोटं नाही. त्यांना हटवण्याच्या काही प्रक्रिया असतील. त्यानुसार पंतप्रधान आणि राष्ट्रपती निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. हा कुठल्या आघाडीचा किंवा कोणत्या पक्षाचा विषय नाही. राजकीय हेतूने त्याकडे पाहू नये. जेवढे शिवभक्त आहेत ते नाराज आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us