
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल अनेक चर्चा होत असतात, पण माझ्या असं लक्षात आलं की संघाबाबत जी माहिती आहे ती खूप कमी प्रमाणात आहे, तसेच जी माहिती उपलब्ध आहे त्यातील बरीच माहिती ही तथ्याला धरून नाहीये, त्यामुळे आपण आपल्याकडून संघाबद्दल लोकांना खरी आणि योग्य माहिती दिली पाहिजे, संघावर जी चर्चा होते ती धारणांवर आधारित न राहाता तथ्यांवर आधारित असावी‘ असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात इतके देश आहेत, परंतु मानवता एक आहे. संघाच्या निर्मितीचा उद्देश भारत आहे, संघाच्या कार्याचा उद्देश भारत आहे. आणि संघाचं योगदान भारताला विश्वगुरू बनवण्यात आहे. डॉ. हेडगेवार जन्मजात देशभक्त होते. ही आवड त्यांच्या हृदयात लहानपणापासूनच होती. डॉ. साहेब कोलकाता येथे गेले, त्यांनी तिथे वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला, ते तिथे अनुशीलन समितीमध्येही सक्रिय होते. किलक्यनाथ चक्रवर्ती आणि रासबिहारी बोस यांच्या पुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्यांचे सांकेतिक नाव ‘कोकेना‘ असं होतं. असं यावेळी भागवत यांनी म्हटलं आहे.
आपल्याला अशा नायकाची आवश्यकता आहे जो शुद्ध चारित्र्याचा असेल, जो समाजाशी सतत संपर्कात असेल, ज्यावर समाजाचा विश्वास असेल, जो समाजासाठी आपले जीवन आणि मृत्यूचं बलिदान देण्यास तयार असेल. ज्याचे जीवन वातावरण निर्माण करते, असे नायक निर्माण केले पाहिजेत. रवींद्रनाथ ठाकूर यांनी स्पष्टपणे त्या संदर्भात लिहिले आहे की डॉ. हेडगेवार यांनी एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाल्यानंतर त्यावर चर्चा केली. संघाची औपचारिक घोषणा 1925 ला झाली. मात्र संघाची बीज प्रत्यक्षात त्याआधीच अनेक वर्षांपूर्वीच पेरली गेली होती, असंही यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
गांधीजींनी म्हटलं आहे की, आपला देश ब्रिटिश येण्यापूर्वी खूप आधीपासून एकसंध होता. आपल्या देशाचे अस्तित्व खूप प्राचीन आहे. परिस्थिती बदलते पण एकता बदलत नाही. संघ 100 वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे, संघ चालवण्याचा उद्देश काय आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का सुरू झाला? त्याच्या मार्गात किती अडथळे आले? सर्व परिस्थितींना तोंड देऊनही स्वयंसेवकांनी आपलं कार्य सुरूच ठेवून संघाला पुढे का नेले? 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ते नवीन योजनांबद्दल का बोलत आहेत? जर याचे उत्तर एका वाक्यात द्यायचे असेल तर ते म्हणजे संघाच्या प्रार्थनेच्या शेवटी, आपण दररोज म्हणतो भारत माता की जय, हा आपला देश आहे, त्या देशाचा जयजयकार केला पाहिजे, देशाला जगात अग्रगण्य स्थान मिळाले पाहिजे, असं भागवत यांनी म्हटलं आहे.