आईसक्रीम पार्लर ते एटीएम मशीन… आश्रम की फाईव्ह स्टार हॉटेल?; शिवसेना ते शेतकरी नेते… कोण आहेत करौली बाबा?

| Updated on: Mar 22, 2023 | 11:37 AM

आधी शेतकरी नेते असलेले संतोष सिंह भदौरिया ऊर्फ करौली बाबा यांचं अचानक नशीब बदललं. तुरुंगातून आल्यानंतर त्यांनी थेट लोकांवर उपचार सुरू करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वत:चा आश्रमही सुरू केला. हा आश्रम जणू फाईव्ह स्टार हॉटेलच.

आईसक्रीम पार्लर ते एटीएम मशीन... आश्रम की फाईव्ह स्टार हॉटेल?; शिवसेना ते शेतकरी नेते... कोण आहेत करौली बाबा?
karauli sarkar baba
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कानपूर : संतोष सिंह भदौरिया उर्फ करौली बाबा सध्या भलतेच चर्चेत आहेत. या बाबांचा आश्रम फाइव्ह स्टार हॉटेलसारखाच आहे. या आश्रमात सर्व काही मिळतंय. एटीएम मशीनपासून ते कँटिन आणि आईसक्रीम पार्लरपर्यंत सर्व सोयी सुविधा या आश्रमात आहेत. आश्रमातच हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग करण्याचे काऊंटरही लावण्यात आले आहेत. तसेच पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठीचे वेगवेगळे काऊंटर लावण्यात आले आहेत. त्यामुळे या आश्रमात जाताच डोळे दिपून जातात. आश्रमाच्या भव्यतेनेच भक्त भारावून जातात.

दरम्यान, नोएडाला उपचारासाठी आलेल्या डॉ. सिद्धार्थ चौधरी यांनी करौली शंकर म्हणजे करौली बाबांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाबांनी दाखवलेला चमत्कार दिसत नसल्याचं चौधरी यांनी सांगितलं होतं. त्यामुळे बाबांच्या बाऊन्सरने त्यांना एका खोलीत बंद करून बेदम मारहाण केली. लोखंडाच्या रॉडने मारहाण करत लाथाबुक्क्याही घातल्या. जेव्हा बाबांना या डॉक्टरला झालेल्या मारहाणीबद्दल विचारले तेव्हा हे एक षडयंत्र आहे. हा डॉक्टर प्लांट केलेला होता, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बदनामीसाठी पाठवलं

या डॉक्टरला मला बदनाम करण्यासाठी पाठवलं होतं, असं बाबाचं म्हणणं आहे. कँपसमध्ये लावण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तो स्वत: सर्वांना धन्यावाद म्हणत जाताना दिसत आहे. संपूर्ण कँपसमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. हा डॉक्टर येथून सुरक्षितपणे बाहेर गेल्याची काही रेकॉर्डिंग किंवा पुरावा आहे का?असा सवाल बाबांना विचारण्यात आला. तेव्हा आपल्या आश्रमात केवळ 14 दिवसांचाच रेकॉर्डिंग डेटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपली मजबुरी असल्याने आपण साक्ष देऊ शकत नाही, असं सांगतानाच पोलिसांचं आश्रमात स्वागत आहे. ते येऊन चौकशी करू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

एका दिवसात बरे होतात लोक

आपल्याकडे शिवाची शक्ती असल्याचा या बाबाचा दावा आहे. एकाच दिवसात आपण लोकांचे आजार बरे करतो असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर बाबाने एका महिलेला बोलावून तिच्या आजाराची माहिती आणि वैयक्तिक समस्याही सांगितली. दुसरे बाबा नाव पत्ता आणि बँक डिटेल्स सांगतात. त्याचा काय फायदा? त्याने लोकांचा उद्धार होत नाही. मी तर लोकांच्या समस्या आणि आजाराबाबत माहिती देतो, असं ते म्हणाले. या आश्रमात बिहार, लखनऊ आणि देशातील इतर राज्यातूनही लोक आले आहेत. डॉक्टरांकडे उपचार घेऊन काहीच फायदा झाला नाही. मात्र, बाबांकडे येताच मन शांत झालं आणि आजारही बरे झाल्याचं इथे आलेले लोक सांगतात.

कोण आहे करौली बाबा?

संतोष सिंह भदौरिया ऊर्फ करौली बाबा हे मूळचे उन्नाव येथील बारह सगवर येथील रहिवासी आहेत. संपूर्ण देशात शेतकरी नेते महेंद्र सिंह टिकैत यांचं आंदोलन सुरू होतं. त्याचवेळी कानपूरमध्ये शेतकरी संघटनेचे नेते संतराम सिंग यांचा मर्डर झाला. त्यावेळी महेंद्र सिंह टिकैत यांनी संतोष सिंह भदौरिया यांना कानपूरच्या सरसोल क्षेत्राची जबाबदारी दिली. त्यावेळी भदौरिया यांची शेतकरी आंदोलनाच्या काळात पोलिसांशी शाब्दिक चकमकही उडाली. मारहाणीवर प्रकरण आलं. त्यानंतर संतोष सिंह भदौरिया यांना अटक करण्यात आली. तुरुंगात गेल्यानंतर ते प्रसिद्ध झाले. तिथूनच त्यांचं नशीब पालटलं.

शिवसेना ते शेतकरी नेते

करौली बाबा ऊर्फ संतोष सिंह भदौरिया हे कानपूरचे रहिवासी आहेत. 2003मध्ये ते शिवसेनेत सामील झाले होते. त्यानंतर ते शेतकरी युनियनचे नेते झाले. 2010मध्ये किसान युनियनमध्ये काम करतानाच अनेक थेरपी शिकण्यासाठी ते केरळला गेले होते. केरळमध्ये थेरपी शिकल्यानंतर डॉक्टर म्हणून त्यांनी कानपूरच्या सिव्हिल लाइन्स येथील आपल्याच घरात क्लिनिक उघडलं. क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक लेपद्वारे एंजायटी, सर्व्हाइकल आणि बॅकपेनशी संबंधित आजार बरे करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 2012मध्ये आपली मुलं लव आणि कुश यांच्या नावाने आश्रम उघडला. 14 एकरवरील आश्रम त्यांनी एखाद्या छोट्याशा शहरासारखाच विकसित केला.

अनेक गुन्हे दाखल

त्यांच्या आश्रमातील समर्थकांची संख्या दहा वर्षाच्या आत पाच हजारावर गेली आहे. अमावस्येच्या दिवशी ही संख्या चार टक्के अधिक होते. सुमारे 20 हजार लोकांच्या समुहात काचेच्या केबिनमध्ये बसून ते प्रवचन देतात. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 1992-95 दरम्यान हत्या आणि चर्चची जमीन हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच सरकारी अभिलेखांमध्ये हेराफेरी केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

सकाळी 8 वाजल्यापासून रांगा

आजार बरे करण्यासाठी बाबाकडे सकाळी 8 वाजल्यापासून रांगा लागतात. त्यांची भेट घेण्यासाठी 5100 रुपयांचं टोकन घ्यावं लागतं. आश्रममध्ये माईक लावलेला आहे. लोक आळीपाळीने येतात आणि आपली समस्या सांगतात. आश्रमात दोन मंदिर आहेत. एक करौली सरकार राधा रमण मिश्र यांचं. तर दुसरं कामाख्या देवीचं आहे. आता येथील लोक त्यांना करौली बाबा म्हणून ओळखतात.