Surendra Sharma Case : तब्बल 46 दिवस रोज नवऱ्याच्या मृतदेहावर उभं राहून तिने आंघोळ केली, सिया गोयल तर हिच्यासमोर काहीच नाही
Surendra Sharma Case : एका जुन्या प्रकरणात पोलीस घरी आले, तेव्हा ती प्रचंड घाबरली. तिचा संयम सुटला व तिने पोलीस आणि दीरासमोर अंगावर काटा आणणारं सत्य सांगितलं. पोलिसांनी आरोपी पत्नी रुबीला ताब्यात घेतलं आहे.

सध्या देशभरात पुण्याचं केतन अग्रवाल प्रकरण गाजत आहे. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनला लोहगडावरुन ढकलून दिलं. आता त्यापेक्षाही एक धक्कादायक प्रकरण समोर आलय. ही घटना उत्तर प्रदेशच्या आग्र्यामधील आहे. हे प्रकरण असं आहे,ज्याने प्रसिद्ध थ्रिलर चित्रपट दृश्यमला सुद्धा मागे टाकलय. या प्रकरणात पत्नीने मोठ्या चालाखीने पतीला संपवलं नंतर त्याचा मृतदेह घरातच बाथरुममध्ये फरशी खाली पुरला. नंतर त्यावर प्लास्टर करुन घेतलं. ही महिला इतकी शातिर होती की, तिने पोलिसात जाऊन नवरा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तब्बल 46 दिवस ती पोलीस आणि नातेवाईक यांची दिशाभूल करत होती. या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता हादरवून टाकणारे खुलासे होत आहेत. पोलीसही ऐकून सून्न झाले आहेत.
महिलेने पतीला बाथरुममध्ये पुरलय हे माहित नव्हतं. एका जुन्या प्रकरणात पोलीस घरी आले, तेव्हा ती प्रचंड घाबरली. तिचा संयम सुटला व तिने पोलीस आणि दीरासमोर अंगावर काटा आणणारं सत्य सांगितलं. पोलिसांनी आरोपी पत्नी रुबीला ताब्यात घेतलं आहे. बाथरुममध्ये खोदकाम केल्यानंतर पोलिसांना तिथे पती सुरेंद्र कुमार शर्मा यांच्या मृतदेहाचा सांगाडा मिळाला. पोलीस चौकशीत रुबीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्या बाथरुमच्या फरशीखाली तिने नवऱ्याचा मृतदेह पुरलेला त्या बाथरुममध्ये जाऊन रोज ती आंघोळ करायची. मृतदेहावर उभी राहून तब्बल 46 दिवस ती आंघोळ करत होती. पण तिच्या मनात या बद्दल जराही संकोच, पश्चातापाची भावना नव्हती.
मृतदेह घरातच लपवायचा हे तुला कसं सुचलं?
पोलिसांनी रुबीला विचारलं की, मृतदेह घरातच लपवायचा हे तुला कसं सुचलं? त्यावर तिने बिनधास्त उत्तर दिलं. “मी दृश्यम चित्रपट खूप आधी पाहिला होता. ती कथा माझ्या चांगली लक्षात होती. नवऱ्याला संपवल्यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी मला जे योग्य वाटलं ते मी केलं” घरात सासूच्या झोपेच्या गोळ्या होत्या. पती सुरेंद्र कधी कधी ते गोळ्या खायचे. रुबीने रात्री खीर बनवली त्यात मोठ्या प्रमाणात या झोपेच्या गोळ्या मिसळल्या. तीच खीर सुरेंद्रला खाऊ घातली. गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे सुरेंद्रचा मृत्यू झाला.
नवऱ्याचा मृतदेह पलंगावर असूनही कोणाला काही कळलं नाही
दुसऱ्या दिवशी नवऱ्याचा मृतदेह पलंगावर होता. रुबीने प्लानिंगनुसार मुली आणि सासूला वायू विहारमध्ये दीराच्या घरी पाठवून दिलं. त्यानंतर तिने 400 रुपये देऊन बाहेरुन माती मागवली. बाथरुमची लादी तोडली. सुरेंद्रचा मृतदेह खेचून तिथेपर्यंत घेऊन गेली. खड्डयात नवऱ्याचा मृतदेह टाकल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात मीठ आणि माती टाकून तो पुरला. दुसऱ्या दिवशी रुबीने मिस्त्रीला घरी बोलावलं. बाथरुममधील तुटलेल्या लादीवर पुन्हा प्लास्टर केलं. त्यानंतर दीराच्या घरी जाऊन चार दिवसांपासून नवरा बेपत्ता असल्याचं रडून नाटक केलं.