tv9 Special: ‘दिलासा घोटाळा’ या नावानं उदयास आलेल्या नव्या घोटाळ्याची नेमकी व्याख्या काय?

| Updated on: Apr 14, 2022 | 7:26 PM

एकंदरीतच संजय राऊत यांनी मारलेला दिलासा घोटाळ्याचा आरोप गंभीर आहे. कारण हा टोला थेटपणे न्यायालयाच्या निर्णयांकडे इशारा करतोय.

tv9 Special: दिलासा घोटाळा या नावानं उदयास आलेल्या नव्या घोटाळ्याची नेमकी व्याख्या काय?
दिलासा घोटाळा म्हणजे काय?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : ‘दिलासा घोटाळा’ (Dilasa Ghotala) हे नवं नाव चर्चेत आलं आहे. त्याला कारण ठरलंय संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेलं ट्वीट! 13 एप्रिल रोजी संजय राऊत यांनी आणखी एक दिलासा घोटाला, असं म्हटलं आणि थेट हायकोर्टाच्या निर्णयावरच शंका उपस्थित केली. मुंबई हायकोर्टानं सोमय्यांना (Mumbai High Court on Somaiya) अटकपूर्व जामीन दिला आणि 4 दिवसांपासून नॉटरिचेबल असलेले सोमय्या बुधवारी संध्याकाळी मुंबईत आले. INS विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली 58 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊतांचा आहे. माजी सैनिकाच्या तक्रारीनंतर गुन्हाही दाखल झाला. मात्र सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोमय्यांना हायकोर्टानं जामीन मंजूर केला..पण विशिष्ट पक्षाच्याच लोकांना अटकेपासून संरक्षण कसं मिळतं ?, असा सवाल राऊतांनी केलाय. राऊतांच्या रोख भाजपच्या कोणत्या नेत्यांवरही आहे, हेही पाहणं गरजेचं आहे.

भाजपच्या कुणाकुणाला दिलासा?

  1. मुंबई बँक घोटाळा प्रकरणात प्रवीण दरेकरांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा
  2. दिशा सालियान प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणेंना दिंडोशी सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानं दिलासा
  3. INS विक्रांत घोटाळ्याच्या आरोपात सोमय्यांना मुंबई हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळाल्यानं दिलासा

आणखी एका घोटाळ्याचा प्रोमो

4 दिवसांच्या नॉटरिचेबलनंतर, सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला इशारा दिलाय. आता सोमय्या आणखी एक घोटाळा बाहेर काढणार आहेत. 5 घोटाळे काढल्याचा दावा करत सोमय्यांनी नॉटरिचेबल का झालो, याचं कारणही सांगितलं होतं. या घोटाळ्यांचा पाठपूरावा करण्यासाठी मी नॉटरिचेबल झालो, असं ते म्हणाले.

तसंच शुक्रवारी आणखी एक घोटाळा बाहेर काढणार, असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलाय. सोमय्यांना कोर्टानं जामीन दिला असला तरी, भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटलेले नाहीत, त्यामुळं तुम्ही आरोपीच आहात, अशा शब्दात सोमय्यांना राऊतांनी डिवचलंय. तर सोमवारी पोलिसांसमोर हजर राहणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलंय.

दरम्यान, दिलासालय की न्यायालय, असा उपहासात्मक टोला लगावणारी एक फेसबुक पोस्टही व्हायरल झाली आहे.

महाविकास आघाडीतील कुणाकुणाला दिलासा नाही?

  1. अनिल देशमुख यांना दिलासा नाही, भ्रष्टाचाराचे आरोप
  2. नवाब मलिकांना दिलासा नाही, मनी लॉड्रिंगचा आरोप
  3. संजय राऊतांच्या घरावर कारवाई, मनी लॉड्रिंगचा आरोप
  4. उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई
  5. प्रताप सरनाईक यांच्यावरही ईडीची कारवाई

एकंदरीतच संजय राऊत यांनी मारलेला दिलासा घोटाळ्याचा आरोप गंभीर आहे. कारण हा टोला थेटपणे न्यायालयाच्या निर्णयांकडे इशारा करतोय. त्यांनी वर्तवलेल्या या गंभीर इशाऱ्याचे अर्थ आगामी काळात राजकीय घडामोडींवर उमटताना दिसले, तर आश्चर्य वाटायला नको! ‘दिलासा घोटाळा हा न्याय व्यवस्थेला अलीकडेच लागलेला डाग आहे. दिलासा घोटाळा अल्कायदा आणि कसाब पेक्षा भयंकर आहे एकाच पक्षाचे ठग दिलासा घोटाळ्याचे लाभार्थी कसे असू शकतात? हा प्रश्नच आहे.’ असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. याचं उत्तर नेमकं कोण आणि कसं शोधून काढणार, हाही तितकाच गंभीर मुद्दा यानिमित्तानं उपस्थित झालाय.

पाहा व्हिडीओ :