सरकार बरखास्त करा, अशी चंद्रकांत पाटलांची मागणी! खरंच तसं करणं शक्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात?

| Updated on: Jan 22, 2022 | 10:09 PM

भाजपला सत्तेची स्वप्न पडत असल्यानं, राज्यपालांकडे तक्रार केल्याचा पलटवार महाविकास आघाडीनं केलाय. पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.

सरकार बरखास्त करा, अशी चंद्रकांत पाटलांची मागणी! खरंच तसं करणं शक्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात?
ठाकरे सरकार बरखास्त करण्याची चंद्रकांत पाटलांची मागणी
Follow us on

ठाकरे सरकार कोसळणार? किंवा ऑपरेशन कमळ होणार, असं भाजपचे नेते नेहमीच बोलतात..मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी थेट सरकारच बरखास्त करण्याची मागणी केलीय..ठाकरे सरकारनं 3 महत्वाच्या चुका केल्याचं चंद्रकांत पाटलांनी राज्यपाल कोश्यारींना सांगितलंय. आतापर्यंत ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी थेट सरकारचं बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे केली.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांना 4 कोटी 33 लाखांचा माफ केलेला दंड …नियम समितीतील बदल…आणि विद्यापीठ कायद्यातील बदल…अशा 3 तक्रारी घेऊन चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटले…आणि मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल करुन सरकार बरखास्तीची मागणी केली…
चंद्रकांत पाटलांच्या निशाण्यावर तिघे जण आहेत…

काय आहे आरोप?

पहिल्या क्रमांकावर आहेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक..ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन गार्डनमधील इमारतीत अनधिकृत बांधकाम केल्यानं सरनाईकांना महापालिकेनं 4 कोटी 33 लाखांचा दंड आकारला. मात्र मंत्रिमंडळानं हा दंड माफ केला. राज्यपालांनी जी शपथ दिली त्याचा भंग असल्याचं चंद्रकांत पाटलांचं म्हणणंय. चंद्रकांत पाटलांचा दुसरा आक्षेप हा नियम समितीवरुन आहे. विधानसभेचं अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. मात्र उपाध्यक्ष नगहरी झिरवळ यांना अध्यक्षपदाचे अधिकार देणं हे बेकायदेशीर असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. आणि तिसरी तक्रार ही विद्यापीठ कायद्यातील बदलावरुन आहे. यूजीसीला विश्वासात न घेता कायद्यात बदल करुन मंत्र्यांना कुलगुरुंच्या वर बसवण्यात आल्याची टीका चंद्रकांत पाटलांची आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काय म्हणते?

तर भाजपला सत्तेची स्वप्न पडत असल्यानं, राज्यपालांकडे तक्रार केल्याचा पलटवार महाविकास आघाडीनं केलाय. पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. सत्तेत पुन्हा येण्याची स्वप्न भाजपचे नेते बघत आहेत. त्यांनी ती खुशाल बघत राहावीत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तर घोडेबाजार करता आला नसल्यानं भाजपाल दुःख झालं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

तज्ज्ञांनी काय म्हटलं?

आता राज्यपालांकडे तक्रार करुन, मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची जी मागणी चंद्रकांत पाटलांनी केलीय. अशा तक्रारीवरुन सरकार बरखास्त होऊ शकते का ?, घटनातज्ज्ञ काय सांगतायत, तेही समजून घेणं गरजेचं आहे.
सरकार कायद्यानुसार किंवा घटनेनुसार सरकार चालवण्यास असक्षम असेल, तरच राष्ट्रपती राजवट लावता येऊ शकते. यासाठीच्या बाबीही ठळकपणे निदर्शनास आणून दिल्या, तरच तसं करता येऊ शकतं. मात्र आताच्या घडीला तशा कोणत्याही बाबी समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे सरकार बरखास्त होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणंय. भाजपचे प्रदेशाध्यक्षांनीच राज्यपालांकडे मंत्रिमंडळ बरखास्तीची मागणी केलीय..आता राज्यपाल चंद्रकांत पाटलांच्या तक्रारींवर काय निर्णय घेतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ –