आनंद अभ्यंकर ते विनायक मेटे! 10 वर्षांनंतरही अपघात सत्र सुरुच, मुंबई पुणे महामार्गाबाबत उत्तर न मिळालेले 3 प्रश्न

| Updated on: Aug 14, 2022 | 12:26 PM

Mumbai Pune Express Highway : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वेगमर्यादेचं उल्लंघन सर्रास करणाऱ्यावर कारवाई कितपत होते, असा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतो.

आनंद अभ्यंकर ते विनायक मेटे! 10 वर्षांनंतरही अपघात सत्र सुरुच, मुंबई पुणे महामार्गाबाबत उत्तर न मिळालेले 3 प्रश्न
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे (Mumbai Pune Express Highway) हा तसा विकासाला चालना देणारा हायवे म्हणून तर पाहिला जातोच. या महामार्गामुळे मुंबई-पुणे अंतर अगदी जवळ आलं. पण हे अंतर जवळ येत असताना या महामार्गवर झालेल्या अपघातांची संख्याही काळजी करायला लावणारी आहे. सर्वसामान्य माणसांचा जीवही या महामार्गावर गेला आणि काही सेलिब्रिटीनीवरही या महामार्गावर झालेल्या अपघातांनी घाला घातला आहे. रविवारी सकाळी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Accident News) यांच्या अपघाती मृत्यूमुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेबाबतच तीन गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हेच प्रश्न तीन 10 वर्षांपूर्वीही उपस्थित करण्यात आले होते. अभिनेते आनंद अभ्यंकर (Anand Abhyankar Accident News) यांचा 2012 साली मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला होता. याच अपघातात त्याचा मृत्यू झाला होता. आता दहा वर्षांनी पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला आहे. यावेळी विनायक मेटे यांचं या अपघातामध्ये निधन झालंय. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी उपस्थित करण्यात आलेले सवाल आता पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

सवाल क्रमांक 1 : टोल अफाट आणि पोलिसांचं वचक?

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे म्हटला की काहींना तो रेसिंग ट्रॅक असल्यासारखाच वाटतो. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर एकतरी गाडी वाऱ्याच्या वेगाने सुस्साट जाताना दिसून आली नाही, असं होत नाही. मात्र वाऱ्याच्या वेगासोबत खेळ करणाऱ्या या जीवघेण्या वेगावर पोलिसांचा वचक किती आहे, असाही सवाल उपस्थित होतो. प्रचंड वेगाने अपघात घडून अनेक निष्पापांना जीव गमवावा लागल्याच्या घटना फक्त मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरच घडल्या आहेत असं नाही. पण मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वेगमर्यादेचं उल्लंघन सर्रास करणाऱ्यावर कारवाई कितपत होते, असा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतो. वेगमर्यादा पाळजी जात नसेल, तर याचा अर्थ पोलिसांचा धाक मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन गाड्या हाकणाऱ्यांना आहे की नाही, अशी शंका घेतली जाते. तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांत मुंबई पुणे एक्क्स्प्रेस हायवेवरचा टोलही महागला आहे. अफाट टोल देऊनही सुरक्षिततेचा प्रश्न मात्र राम भरोसे आहे, अशीही भावना अनेकजण व्यक्त करतात.

हे सुद्धा वाचा

सवाल क्रमांक 2 : लेनमधल्या चरींचं काय?

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अजूनही काही भागात काम सुरु आहे. दुरुस्ती देखभालीच्या कामासाठी डायव्हर्जन केलेलं असो किंवा मग मुंबईहून पुण्याला जात असताना खालापूर सोडल्यानंतर रुंदीकरणाऱ्या कामानिमित्त केलेला वाहतुकीतील बदल असेल, मुंबई पुणे महामार्गावरुन गाडी चालवणं अधिकच जिकरीचं झालं. त्यात लेनमधल्या चरींमुळे देखील मुंबई पुणे महामार्गावरावर शंका उपस्थित केले जाऊ लागले.

सवाल क्रमांक 3 : रुग्णालय, रुग्णवाहिका कुठे आहेत?

मुंबई पुणे महामार्गावर अपघात झालाच तर अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी थेट मुंबई किंवा पिंपरी पुण्याशिवाय मध्ये कोणताच पर्याय नाही. लोणावळ्यातही रुग्णालय आहे. पण अनेकदा गंभीर रुग्णांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात आणलं जातं. अशावेळी रुग्णाला वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाल्यानं रुग्णां जीवघेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. रुग्णवाहिकेचा प्रश्न, रुग्णालयं, हा मूलभूत समस्या आजही मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर आहेच. या तीन प्रश्नांना 10 वर्षांत कोणतंही उत्तर मिळू शकलेलं नाही.