
चहा हे जगभरात आवडणारे पेय आहे आणि भारतात तर चहाप्रेमींची कमतरता नाही. सकाळ असो वा संध्याकाळ, उन्हाळा असो वा पावसाळा, चहा पिण्यासाठी लोक कोणताही बहाणा शोधतात. चहाप्रेमींसाठी चहा नाकारणं अशक्य आहे. पण, जास्त चहा पिण्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. मग याचा अर्थ चहा सोडून द्यावा का? चहाप्रेमींसाठी चहा सोडणं म्हणजे एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत, काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी नुकतेच त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून सांगितले की, चहा बनवताना केलेल्या काही चुकांमुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

न्यूट्रिशनिस्टने सांगितले की, चहा बनवण्याची चुकीची पद्धत तुमच्या आरोग्याला सर्वात जास्त नुकसान पोहोचवते. बरेचदा लोक चहा बनवताना सर्वप्रथम पातेल्यात दूध टाकतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. दूधातील प्रोटीन्स चहातील अँटी-ऑक्सिडंट्सशी बांधले जातात, ज्यामुळे काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे चहा बनवण्यासाठी प्रथम पातेल्यात पाणी टाकावे, त्यानंतर चहापत्ती टाकून नीट उकळावे. सर्व सामग्री टाकल्यानंतर शेवटी दूध टाकावे. हीच चहा बनवण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत आहे.

चहा वारंवार गरम करणे ही एक मोठी चूक आहे, जी तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. तयार केलेला चहा जेव्हा वारंवार गरम केला जातो, तेव्हा त्यातील आम्ल (एसिड) सामग्री वाढू शकते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या आणि अॅसिडिटी होऊ शकते. त्यामुळे चहा वारंवार गरम करण्याची सवय आजच बदला.

बरेच लोक घरी चहा गाळण्यासाठी प्लास्टिकच्या गाळणीचा वापर करतात. परंतु, प्लास्टिकच्या चाळणीमुळे तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते. कारण, गरम चहा प्लास्टिकच्या चाळणीतून गाळताना त्यातील प्लास्टिक कंपाऊंड्स चहात मिसळतात, जे शरीरात जमा होऊन गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी स्टीलच्या चाळणीचा वापर करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)