Maharashtra Rain Update : मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस, कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यांना अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट
मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळत असताना मुंबईकरांना आता लांबच लांब वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावर लांबच लांब वाहतूक सुरू आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळत असताना मुंबईकरांना आता लांबच लांब वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गावर लांबच लांब वाहतूक सुरू आहे. बोरिवली ते मुंबई या मार्गावर कांदिवली वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ते गोरेगाव वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, वाहने संथगतीने जाताना दिसत आहेत.

पुढील 24 तास नागपूर सह संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊसा चा नागपूर हवामान विभागाचा अंदाज. तर बंगालच्या च्या खाडीत आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील 5 दिवस विदर्भात चांगला पाऊस होणार आहे. सकल भागातील आणि नद्यांच्या काठावरील गावांनी सावध राहण्याचा इशारा. नागपूर हवामान विभागाने असा अंदाज व्यक्त केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सतत चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागेपल्ली शहरातील जवळपास 15 घरांमध्ये पावसाचे व तलावाचे पाणी शिरले. गडचिरोली पोलीस बचाव पथकाकडून बोटी द्वारे जवळपास 17 लोकांना बाहेर काढण्यात आले.अहेरी आलापल्ली नागेपेली हे तीनही मोठी गावे आजूबाजूला लागून असल्यामुळे तीन गावातील काही भागात तलावाचे पाणी शिरले आहे. गडचिरोली पोलीस यंत्रणेच्या बचाव कार्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

पालघर जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिल्यामुळे वाडा,जव्हार ,विक्रमगड,मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जव्हार मधील वावर वांगणी येथील वाघ नदीला मोठा पूर आला असून आठ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.