
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथे 22 वर्षांपासून बंद असलेली नळ पाणीपुरवठा योजना नावालाच आहे. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले.

गेल्या 22 वर्षापासून आमच्या गावात पाण्याच्या ढोला आणि प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन केली आहे. पण ते निरर्थक ठरत असून आम्हाला दोन- दोन किलोमीटरवर पिण्याचे पाणी आणण्याकरिता जावे लागते. असल्याची खंत येथील स्थानिक महिलांनी व्यक्त केली.

शासनाकडे निधी नसल्याचे कारण देत योजना बंद ठेवण्यात आल्याचे कारण समोर येत होते. या योजनेसाठी पैसाच नसल्याचे कारण वारंवार देण्यात येत होते. गावकरी अर्ज फाटे करुन कंटाळले होते.

या परिस्थितीला कंटाळून गावाचे उपसरपंच पवन खवास यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाने अधिकाऱ्यांसह प्रशासनाची धावपळ उडाली. प्रशासनाच्या या निगरगठ्ठेपणाविरोधात त्यांनी आंदोलन केले.

खवास यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच गावात भीक मागून पैसा जमा केला. तो थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देत, “हे पैसे घ्या पण आमच्या गावाला पाणी द्या” अशी भावनिक विनंती केली.

त्यांच्या या आंदोलनाची एकच चर्चा सुरू आहे. पण चर्चेपेक्षा गावाला पाणी महत्त्वाचे असल्याचे खवास म्हणाले. त्यांच्या या आंदोलनानंतर तरी गावात पाणी येणार का असा सवाल विचारण्यात येत आहे.