
कोंबड्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची सर्रासपणे लागण होत असल्याचं दिसून येत आहे. पण आता कावळ्यांनाही बर्ड फ्ल्यूची लागन झाल्याचं आढळून आलं आहे.

धाराशिव तालुक्यातील ढोकी परिसरात तब्बल 27 कावळ्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

ढोकीत कावळ्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यनंतर पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून ढोकी परिसरातील 25 गावांमध्ये अलर्ट म्हणून कोंबड्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय.

कावळ्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर पशुसंवर्धन विभागाने मृत्यू झालेले कावळे भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते.

कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्यूमुळे झाल्याचा अहवाल समोर आल्यानंतर आता पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आलीय.

ढोकी परिसरातील चारी बाजूने 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय.

कोंबड्यांमध्ये अद्यापपर्यंत हा आजार आढळून आला नसला तरी खबरदारी म्हणून ढोकी येथील चिकन सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत.