
मुंबईतील दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान दोन रेल्वे एकमेकांवर आदळून मोठा अपघात घडलाय. दोन्ही रेल्वे गाड्या क्रॉसिंगवेळी एकमेकांवर आदळल्या. यावेळी शॉट सर्किटही झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

पॉन्डिचेरी एक्सप्रेस आणि गदग एक्सप्रेस क्रॉसिंगवर एकमेकांवर आदळल्या. शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन ते तीन वेळा शॉर्ट सर्किट झालं. तसंच पॉन्डिचेरी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले. तसंच रेल्वेचे डबे मोठ्या प्रमाणात घासले गेल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाची बाब म्हणजे या अपघातात अद्याप तरी कुणी प्रवासी जखमी नसल्याची माहिती मिळतेय. रेल्वे अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे कामगार, फायर ब्रिगेडचे जवान आणि रेल्वे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार दादर स्टेशनवरुन पॉन्डिचेरी एक्सप्रेस निघाली. तिच्या पाठोपाठ गदग एक्सप्रेसही दादर स्टेशनवरुन निघाली. तेव्हा गदग एक्सप्रेसने पॉन्डिचेरी एक्सप्रेसच्या मागील डब्याला धडक दिली. या अपघातात पॉन्डिचेरी एक्सप्रेसचे तीन डबे रेल्वे रुळावर घसरले.

घटनास्थळावरील परिस्थिती पाहली तर पॉन्डिचेरी एक्सप्रेसच्या डबे मोठ्या प्रमाणात घासले गेले आहेत. तसंच रेल्वेच्या मोठ्याल्या स्प्रिंग गळून पडल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे अपघात घडून एक तास उलटला तरीही अपघातग्रस्त रेल्वेचे डबे हटवण्याचं किंवा रेल्वे मार्ग सुरळीत सुरु करण्याचं काम हाती घेण्यात आलं नव्हतं.

मुंबईसारख्या शहरात अशाप्रकारे दोन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्याची घटना चिंतेचा विषय आहे. मुंबईतून रोज शेकडो रेल्वे देशाच्या विविध भागात जात असतात. अशावेळी क्रॉसिंगवर दोन एक्सप्रेस एकमेकांवर आदळल्यानं रेल्वे मंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.