Gold Price Today: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठा चढ-उतार, अवघ्या 6 तासांत….
Gold-Silver Rate Today 02 September Latest News Updates in Marathi : जळगावच्या सराफा बाजारात सणासुदीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार दिसून आली. दुपारी मोठी घसरण होऊन नंतर काही तासांतच पुन्हा वाढ नोंदवली गेली. ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष आता पुढील दरांकडे लागलं आहे.

सणा-सुदीचे दिवस असून सध्या सराफा बाजारात सोनं- चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पहायला मिळते. मात्र सतत वर-खाली होणारे भाव, ग्राहकांना धडकी भरवणारे आहेत. त्यातच आज जळगावच्या सराफा बाजारात मोठी घडामोड झाल्याचं दिसून आलं.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात अवघ्या काही तासांत मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. दुपारी 12 वाजता सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात पुन्हा लक्षणीय वाढ झाली आहे.
दुपारी 12 वाजता सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार 950 रुपयांची घसरण झाली होती. त्याचवेळी चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आणि चांदीचा भाव 8 हजार रुपयांनी खाली आला होता.
मात्र या घसरणीनंतर आता बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. अवघ्या सहा तासांत सोन्याच्या दरात 1 हजार 800 रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे एकाच दिवसात सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.
सध्याचा सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 345 रुपये इतका आहे. काही तासांत झालेल्या मोठ्या चढ-उतारामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष बाजारातील पुढील दरांकडे लागलं आहे.
तर चांदीच्या दरातही मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. जीएसटीसह चांदीचा सध्याचा भाव 2 लाख 42 हजार 50 रुपये इतका आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशातील नागरिकांना सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केलं. काल त्यांनी अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत देशातील नागरिकांशी संवाद साधला. गरज नसल्यास सोनं खरेदी टाळावं, असं त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं. त्यांच्या आवाहनानंतर दुसऱ्याच दिवशी जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही तासांत झालेली घसरण आणि त्यानंतर झालेली दरवाढ यामुळे सराफ बाजारातील वातावरण चर्चेचा विषय ठरले. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरातील ही अस्थिरता आगामी काळात कायम राहणार की दर पुन्हा स्थिर होणार, याकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.