
महाराष्ट्राची शान आणि पैठणीची राजधानी म्हणून ओळख असलेल्या येवला शहराची पैठणी आज जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात होणारी सातत्यपूर्ण वाढ आता थेट या 'महावस्त्राच्या' किमतीवर परिणाम करत आहे.

सातासमुद्रापार ज्या पैठणीची ओळख आहे, ती येवल्याची पैठणी महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचं प्रतीक मानली जाते. पाच हजार रुपयांपासून ते अगदी लाखो रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या पैठणीचं मुख्य आकर्षण म्हणजे त्यातील अस्सल जर.

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा सोने आणि चांदीच्या दरावरही मोठा परिणाम झाला आहे. सोने-चांदीच्या दरवाढीचा फटका पैठणी साड्यांनाही बसला आहे. चांदी आणि सोन्याचा मुलामा असलेल्या पैठणी साड्यांच्या किंमती वाढल्या आहेत.

चांदीच्या दरात दुप्पट वाढ झाल्याने कारागीर आणि विक्रेते चिंतेत आहेत. येवल्यातील बाजारपेठेत 5 हजार रुपयांपासून लाखो रुपयांच्या किंमतीच्या पैठणी साड्या मिळतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पैठणी साड्यांच्या किंमतीत बरीच वाढ झाल्याचं ग्राहक सांगत आहेत.

ही जर तयार करण्यासाठी चांदीच्या तारांचा वापर केला जातो आणि त्यावर सोन्याचा मुलामा चढवला जातो. यामुळेच पैठणीला ती राजेशाही चमक प्राप्त होते. मात्र, सध्या सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठल्याने पैठणीच्या निर्मितीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

पैठणी ही केवळ साडी नसून संस्कृतीचा ठेवा असलेल्या या पैठणीच्या किंमती वाढल्याने कारागीर आणि विक्रेते दोघेही चिंतेत आहेत. लग्नसराईचा हंगाम असूनही वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक विचार करूनच खरेदी करत आहेत. तर दुसरीकडे, सोन्या-चांदीचे दर कमी होतील आणि पैठणी पुन्हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, अशी आशा महिला व्यक्त करत आहेत.

याआधी 4 हजार रुपये किलोने चांदीची जर आम्हाला मिळत होती. आज त्याच चांदीच्या जरीचा भाव 5500 रुपये किलो इतका झाला आहे. तर 5500 रुपये किलोने मिळणारी रेशम आज 7000 रुपये किलोने मिळत आहे. अस्सल चांदीची जर पैठणीत वापरण्यात येत असल्याने साडीचं उत्पादन शुल्क वाढलंय.