
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. साक्षी आणि महिपतची कारस्थानं उघड करण्याचा अर्जुन सर्वतोपरी प्रयत्न करतोय. मात्र अर्जुनचा न्याय मिळवण्यासाठीचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही.

अर्जुनच्या वाटेत आता महिपत आणखी एक अडसर आणणार आहे. साक्षीच्या बाजूने केस लढवण्यासाठी महिपतने हुकमी एक्का शोधून काढला आहे.

हा हुकमी एक्का म्हणजे नामांकित वकील दामिनी देशमुख. मालिकेच्या पुढील भागांमध्ये अर्जुन विरुद्ध दामिनी हा सामना कथानकाची उत्कंठा आणखी वाढवणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोग या मालिकेत दामिनी देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना क्षिती म्हणाली, ‘ठरलं तर मग ही संपूर्ण महाराष्ट्राची आवडती मालिका आहे. मीसुद्धा न चुकता ही मालिका पाहते. या मालिकेचा एक भाग होताना अत्यंत आनंद होतोय."

"दामिनी देशमुख या वकीलाची भूमिका मी साकारणार आहे. दामिनी देशमुख दुसऱ्यांना हरवण्यासाठी नाही तर स्वत: जिंकण्यासाठी केस लढते. साक्षीची केस यापुढे ती लढणार आहे. त्यामुळे हे पात्र साकारण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे," अशी भावना क्षिती जोग यांनी व्यक्त केली.’