Photo : केरळमध्ये परतीच्या पावसाचं थैमान! शेती उद्ध्वस्त, घरं पत्त्यासारखी कोसळली; 35 जणांचा मृत्यू
केरळमध्ये परतीच्या पावसानं अक्षरश: थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

केरळमध्ये परतीच्या पावसानं अक्षरश: थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

सोमवारी कोट्टायम जिल्ह्यातील कुट्टीकल आणि इडुक्की जिल्ह्यातील कोक्यारमध्ये मलब्याखाली अडकलेले मृतदेह काढण्याचं काम हाती घेण्यात आली. एनडीआरएफचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरु आहे.

अचनकोविल नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या पन्दलमजवळ चेरिकल, पूझिकाडू, मुदियूरकोणम आणि कुरमबाला या परिसराला महापुराचा सामना करावा लागतोय. अचनकोविलमध्ये पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तर आरणमुला, किंदगन्नूर आणि ओमल्लूरच्या किनारा परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळमधील मुंदकायममधील एक घर पाण्याच्या प्रवाहात अक्षरश: वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक घराचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने 20 ते 24 ऑक्टोबरपर्यंत हवामान अधिक खराब होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

केरळचे राजस्व मंत्री के. राजन यांनी सांगितलं की धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यानं पाण्याची पातळी वाढल्यामुळे राज्यातील 10 धरणांना रेड अलर्ट दिला आहे. तसंच कक्की धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.