
वडिलांनी घेतलेले कर्ज त्यांच्या निधनानंतर मुलाला फेडावे लागते का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. या प्रश्नावरुन अनेकदा लोकांमध्ये संभ्रमही निर्माण होतो. पण तुम्हाला माहितीये का? भारतीय कायद्यानुसार, वडिलांच्या कर्जासाठी मुलगा वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत त्याला वडिलांचे कर्ज फेडावे लागू शकते.

भारतीय उत्तराधिकार कायदा १९२५ नुसार, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेतून कर्जाची परतफेड केली जाते. जर मुलाने कर्जाची हमी दिली नसेल किंवा त्याला वडिलांच्या मालमत्तेचा लाभ मिळाला नसेल, तर त्याला वैयक्तिकरित्या कर्ज फेडण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नाही.

भारतीय करार कायदा १८७२ नुसार, कर्जाची जबाबदारी फक्त करार केलेल्या व्यक्तीवरच असते. त्यामुळे, जर मुलगा वडिलांच्या कर्जासाठी जामीनदार नसेल, तर तो वैयक्तिकरित्या यासाठी जबाबदार ठरत नाही.

जर वडिलांनी कर्ज घेतले आणि मालमत्ता सोडली, तर मुलगा त्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत कर्ज फेडण्यास जबाबदार असतो. पण जर वडिलांनी कर्ज घेतले असेल आणि कोणतीही मालमत्ता सोडली नसेल, तर मुलावर कर्ज फेडण्याची जबाबदारी येत नाही. तसेच जर मुलगा वडिलांच्या कर्जासाठी जामीनदार असेल, तर तो वैयक्तिकरित्या पूर्णपणे यासाठी जबाबदार असतो.

सर्वोच्च न्यायालयाने के. राजामौली विरुद्ध एव्हीकेएन स्वामी (२००१) याप्रकरणी याबद्दल स्पष्ट मत नमूद केले होते. जर वारसाला कोणतीही मालमत्ता मिळाली नसेल, तर तो कर्जासाठी जबाबदार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले होते.

सीआयटी विरुद्ध स्वर्गीय ओमप्रकाश झुनझुनवाला यांच्या इस्टेट (२००२) प्रकरणातही न्यायालयाने वारसाची जबाबदारी केवळ मृत व्यक्तीकडून मिळालेल्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत असल्याचे नमूद केले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की, जर एखाद्या वारसाला मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा फायदा होत असेल, तर तो मालमत्तेच्या मर्यादेपर्यंत कर्ज देण्यास जबाबदार असतो, वैयक्तिकरित्या नाही.

हिंदू कायद्यानुसार, जर वडिलोपार्जित मालमत्तेवर धर्मादाय, सामाजिक किंवा कौटुंबिक कारणांसाठी कर्ज घेतले गेले असेल, तर काही विशिष्ट परिस्थितीत वारसांना मालमत्तेतून ते कर्ज फेडावे लागते.

थोडक्यात, वडिलांच्या कर्जासाठी मुलगा वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो. त्याला वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेच्या मर्यादेपर्यंतच त्याला जबाबदार धरले जाते. जर त्याला कोणतीही मालमत्ता मिळाली नसेल, तर त्याच्यावर कोणतेही दायित्व नसते.

येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आणि लेखांवर आधारित आहे. येथे दिलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. आपल्या विशिष्ट परिस्थितीत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी अनुभवी वकिलाशी संपर्क साधावा.