पहलगाम हल्ल्याच्या 5 दिवसांनीच अतुल कुलकर्णी पोहोचला काश्मीरमध्ये; पाठ फिरवणाऱ्यांना खास आवाहन
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरकडे पाठ फिरवणाऱ्यांना अभिनेता अतुल कुलकर्णीने आवाहन केलं आहे. मी काश्मीरला आलोय, तुम्हीसुद्धा या.. असं म्हणत त्याने काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन याठिकाणी 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले. पहलगामच्या या घटनेनंतर अनेक पर्यटकांनी ऐन पर्यटनाच्या काळात काश्मीरकडे पाठ फिरवली आहे.

दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरला जायला अनेकजण घाबरत आहेत. पुन्हा कधीच काश्मीरला जाणार नाही, असं काहीजण म्हणतायत. अशातच अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी स्वत: काश्मीरला जात मोठा संदेश दिला आहे.

मुंबई ते श्रीनगरला प्रवास करताना अतुल कुलकर्णी यांनी विमानातील फोटो पोस्ट केला आहे. काश्मीरमध्ये एप्रिल-मे महिन्यात पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. परंतु हल्ल्यानंतर विमानातही शुकशुकाट पहायला मिळतोय. नेहमी हे विमान प्रवाशांनी भरलेलं असतं, अशी माहिती क्रू मेंबरने अतुल यांना दिली. या जागा आपल्याला पुन्हा भरायच्या आहेत, असं त्यांनी या फोटोवर लिहिलंय.

'चला, काश्मीरला चला.. मी आलोय, तुम्हीसुद्धा या..' असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं आहे. काश्मीरच्या पर्यटनावर परिणाम व्हावा, हा दहशतवाद्यांचा हेतू होता. परंतु त्यांचा तो हेतू साध्य होऊ द्यायचा नाही, असा संदेश अतुल यांनी दिला आहे.

'हे फ्लाइट्स भरभरून जात होते. आपल्याला ते पुन्हा भरायचे आहेत. दहशतवादाला हरवायचं आहे', असं लिहित त्यांनी विमान प्रवासातील फोटो पोस्ट केले आहेत. काश्मीरमधील व्हिडीओसुद्धा त्यांनी इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. तिथले नागरिक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रॅली काढताना त्यात दिसत आहेत.