
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्या घरात या दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे.

ढोल ताश्यांच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी-ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत. प्रेक्षकांना लवकरच मालिकेत हे कथानक पहायला मिळणार आहे.

हा खास क्षण आणखी खास करण्यासाठी आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सारिका नवाथे, अदिती देशपांडे आणि गिरीजा प्रभू यांनी हजेरी लावली आहे.

अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केलाय. तर अभिनेत्री गिरीजा प्रभू म्हणजेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीने ढोल वाजवून जानकी-ऋषिकेशचं स्वागत केलं आहे.

जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. दोघंही या अभुतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत. अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासाठी देखिल हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या रुपात त्यांची एण्ट्री होत आहे.

याचसोबत 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा निर्माता म्हणून त्यांचं या मालिकेशी जिव्हाळ्याचं नातं आहे.

खूप वर्षांनंतर मालिकेत भूमिका साकारल्याचा वेगळा आनंद होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जानकी-ऋषिकेशच्या आयुष्यातला हा नवा अध्याय प्रेक्षकांना 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत संध्याकाळी 7.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळेल.