
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असूनही मुकेश अंबानी यांनी कॉर्पोरेट जगतात एक अनोखा पायंडा पाडला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा (RIL) वार्षिक अहवाल नुकताच समोर आला आहे. या अहवालात त्यांच्या पगाराबद्दल नमूद करण्यात आले आहे.

मुकेश अंबानी यांनी सलग पाचव्या वर्षी कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे वेतन किंवा मानधन घेतलेले नाही. हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून तो कंपनीच्या आर्थिक शिस्तीचा एक भाग मानला जातो.

मुकेश अंबानी यांचा २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पगार शून्य (Nil) रुपये इतका आहे. २०२०-२१ पासून त्यांनी पगार, भत्ते, परलॅक्स (Perquisites) किंवा निवृत्ती लाभ यांपैकी काहीही घेतलेले नाही. यापूर्वी, २००८ ते २०२० या १२ वर्षांच्या काळात त्यांनी आपले वार्षिक वेतन १५ कोटी रुपयांवर स्थिर ठेवले होते.

२०२० मध्ये कोविड-१९ महामारीच्या काळात उद्योगांवर आलेल्या संकटामुळे मुकेश अंबानी यांनी स्वेच्छेने पगार न घेण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे हित आणि व्यवसायाची स्थिरता याला त्यांनी प्राधान्य दिले होते.

ते पगार घेत नसले तरी अंबानी हे रिलायन्सचे सर्वात मोठे भागधारक (Shareholder) आहेत. कंपनी जेव्हा नफा कमावते, तेव्हा ती भागधारकांना 'लाभांश' (Dividend) देते. २०२४-२५ मध्ये रिलायन्सने प्रति शेअर १० रुपये लाभांश जाहीर केला आहे.

अंबानी कुटुंबाकडे असलेल्या शेअर्सच्या संख्येनुसार त्यांना यावर्षी सुमारे ३,६२२ कोटी रुपये लाभ म्हणून मिळतात. तसेच मुकेश अंबानी यांची मुले ईशा, आकाश आणि अनंत अंबानी हे बोर्डावर Non-Executive Directors म्हणून कार्यरत आहेत.

त्या तिघांनाही पगार मिळत नाही, मात्र बोर्डाच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल सिटिंग फी आणि कंपनीच्या नफ्यातील कमिशन मिळते. या आर्थिक वर्षात या तिघांना प्रत्येकी २.३१ कोटी रुपये मिळाले आहेत. मुकेश अंबानी पगार घेत नसले तरी, कंपनी चालवणाऱ्या इतर वरिष्ठ संचालकांना मोठी रक्कम मिळते.

कंपनीच्या या वार्षिक अहवालातून हे स्पष्ट होते की, मुकेश अंबानी यांनी केवळ संपत्ती निर्माण करण्यावरच नाही, तर एक जबाबदार नेतृत्व म्हणून स्वतःचा आदर्श प्रस्थापित करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे त्यांचे कायम कौतुक होत असते.