Navratri Fast | नवरात्रीच्या उपवासात भूकेवर नियंत्रण कसं ठेवायचं? वाचा, सोपे उपाय
काही लोकांना उपवास करायची अजिबातच सवय नसते. आता तर नवरात्र मध्ये बरीच लोकं उपवास करतात. यात काहीजण पहिल्यांदाच उपवास करणारे देखील असतात. नेहमी उपवास करणाऱ्यांचेच जर उपवास करताना हाल होत असतील तर जे पहिल्यांदा उपवास करतात त्यांचे किती हाल होत असतील? यावर काही उपाय आहेत. हे उपाय, या गोष्टी फॉलो केल्यावर तुम्हाला उपवासाच्या काळात कमी भूक लागेल. काय उपाय आहेत? बघुयात...

फायबरयुक्त फळे: फळे खाल्ली की पोट लवकर भरते. पचन चांगल्या पद्धतीने होतं. फायबर असणारी फळे खा, नक्कीच फायदा होईल. व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी गरजेचे असतात. फायबरयुक्त फळांमध्ये हे सगळं असतं. भूक नियंत्रित करण्यासाठी फळे खा.

पाणी: पाणी भरपूर प्यायलं की डिहायड्रेशन होत नाही. डिहायड्रेशनने खूप भूक लागते त्यामुळे भरपूर पाणी प्यायलं तर शरीर हायड्रेटेड राहतं आणि अर्थातच भूक लागत नाही. उपवासाच्या दिवसात सतत पाणी पिणे खूपच महत्त्वाचे आहे. लिंबूपाणी प्यायल्याने सुद्धा भुकेवर नियंत्रण राहते. पाण्याने पचन सुद्धा चांगले होते. महत्त्वाचं म्हणजे भूक कमी लागते.

रक्तातील साखर वाढली की भूक खूप लागते हे तर माहित असेलच? म्हणूनच मधुमेह असणाऱ्यांना खूप भूक लागते. उपवास असताना साखर असणारं, गोड काहीतरी किंवा फॅट्स आणि मीठ असणारं खायचं टाळा. हे खाल्ल्याने जबरदस्त भूक लागते. भूक नियंत्रित करायची असेल तर असे पदार्थ खाऊ नका.

चांगली झोप घेतली तर भूक फार कमी लागते. रात्री उशिरापर्यंत जागलात तर उशिरापर्यंत काहीतरी खाणार. झोपेमुळे शरीराला आणि पोटाला आराम मिळतो, फारशी भूक लागत नाही. उपवास असताना सुद्धा चांगली झोप घेणं महत्त्वाचं.

उपवास असताना खूप भूक लागते. थोड्या-थोड्या अंतराने काहीतरी खात राहा. सतत काही ना काही खाल्ल्याने भूक कमी लागते. भूक लागली नाही की उपवास देखील मोडत नाही. दर दोन तासाने काही ना काही खात राहा. बराच वेळ काहीच खाल्लं नाही तर डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो.