
पालघरच्या आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून हजारो कोटी रुपये खर्च केले जातात असे सांगितले जाते. मात्र, पालघर जिल्ह्यातील वास्तव पाहता प्रशासकीय यंत्रणा किती खिळखिळी झाली आहे, याचा प्रत्यय येतो.

विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना पिंजाळ नदी पार करून वाकी गावातील शाळेत जाण्यासाठी दररोज अक्षरशः टायर ट्यूबवरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. ही हृदयद्रावक परिस्थिती प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

पावसाळ्यात पिंजाळ नदी दुथडी भरून वाहत असताना, म्हसे गावातील विद्यार्थी शिक्षणाची आस घेऊन या प्रवाहातून मार्ग काढतात. एका टायरच्या ट्यूबवर पाच-पाच मुले बसून नदी पार करतात.

त्यांच्या डोक्यावर दप्तरे, एका हातात शाळेचा ड्रेस आणि पावसाने भिजलेली पुस्तके अशी त्यांची अवस्था असते. या चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालून होणारा हा प्रवास पाहून पालकांचीही दमछाक होते. या मुलांचे काही बरे वाईट झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहेत.

दररोज कपडे भिजत असल्याने, ही मुले सोबत एक अतिरिक्त ड्रेस घेऊन येतात. नदी पार केल्यानंतर ओले कपडे बदलून शाळेचा ड्रेस घालून ती शाळेत पोहोचतात. मुलांसोबत नदीकिनारी येऊन त्यांना टायर ट्यूबवर बसवून पालक नदीच्या दुसऱ्या तीरावर सोडतात आणि ट्यूब पुन्हा घरी घेऊन जातात.

सायंकाळी मुलांची नदीकिनारी वाट बघतात आणि मुलांचा आवाज ऐकू येताच ट्यूब घेऊन त्यांना घेण्यासाठी येतात. हा संघर्ष या आदिवासी बांधवांच्या पाचवीलाच पुजलेला आहे का, असा प्रश्न त्यांना पडतो.

शिक्षण, आरोग्य आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आदिवासी बांधवांना आजही संघर्ष करावा लागतो, हे खेदजनक आहे. आदिवासी ग्रामीण भागात दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च होऊनही ही परिस्थिती का बदलत नाही, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

या मुलांसाठी प्रशासनाने तातडीने पुलाची मागणी पूर्ण करून हा जीवघेणा प्रवास थांबवावा, अशी आर्त मागणी या आदिवासी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.