मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांच्या डोळ्यात पाणी; पत्रकार परिषद घेत पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं…
Vasant More Press conference For MNS Resignation Reason : वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी मनसे पक्ष नेमका का सोडला? याबाबत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. त्यांनी राजीनाम्याचं कारण सांगितलं. वसंत मोरे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 12 मार्च 2024 : पुण्यातील फायब्रँड नेते वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. काहीवेळा आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहित मोरे यांनी राजीनामा दिला.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र कायम राज ठाकरे यांच्या बाजूने उभे राहणारे नेते अशी ओळख असणाऱ्या वसंत मोरे यांनी पक्ष का सोडला? हा प्रश्न सध्या पुण्यात चर्चिला जात आहे.

वसंत मोरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मनसे सोडण्याचं कारण काय? वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं. मनसेच्या पुण्यातील कोअर कमिटीवर मोरे यांनी गंभीर आरोप केलेत.

पुणे लोकसभेबाबत राज ठाकरे यांना चुकीचा अहवाल पाठवला गेला. पुण्यातील कोअर कमिटी पक्षाला संपवण्याचं काम करत आहे. याबाबत मी अमित ठाकरे यांच्याशी वारंवार चर्चा केली. पुढील दोन दिवसांमध्ये मी माझी भूमिका जाहीर करेन, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वसंत मोरे भावूक झाले. मोरे यांच्या डोळ्यात पाणी आलं. मनसे पक्षाला रामराम करताना मोरे भावनिक झाले होते. त्यांनी आपल्या मनातील खदखद यावेळी बोलून दाखवली.