
5 ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत दहा खेळणार असून जेतेपदासाठी भारताला पसंती दिली जात आहे. कारण स्पर्धा भारतात असल्याने त्याचा थेट फायदा टीम इंडियाला होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.

टीम इंडिया 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यातून विजयी सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. तर 10 वर्षांचा आयसीसी चषकांचा दुष्काळ संपण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असणार आहे.

आजी माजी क्रिकेटपटूंनी यावेळी विश्वचषक जेतेपदासाठी आपली मतं मांडली आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंच्या मते टीम इंडियाला जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे.

एकीकडे टीम इंडियाच्या नावाची चर्चा होत असताना फिरकीपटू आर. अश्विनने वर्तवलेल्या भाकीताने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्याने टीम इंडिया ऐवजी दुसऱ्याच संघाला पसंती दिली आहे.

असं पाहिलं प्रत्येक खेळाडू हा आपल्या देशाला प्राधान्य देतो. पण आर. अश्विन याने जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाला पसंती दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आर. अश्विन याने जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाची निवड करण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. टीम इंडियावरील दबाव कमी करण्यासाठी ही निवड केल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

"वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी माझी पसंती ऑस्ट्रेलियाला आहे. मला माहिती आहे अनेक दिग्गज खेळाडूंनी भारताला पसंती दिली आहे. पण ही टीम इंडियाला दडपणाखाली ठेवण्याची रणनिती आहे.", असं त्याने स्पष्टपणे सांगितलं.

आयसीसी स्पर्धा जवळ आली की इतर देशांचे माजी खेळाडू भारताला पसंती देतात आणि संघावरील दडपण वाढवतात. त्याचा थेट परिणाम खेळावर दिसून येतात.

टीम इंडिया जेतेपदासाठी प्रमुख संघांपैकी एक आहे. पण मला संघावर विनाकारण दडपण आणायचं नाही. म्हणून मी माझी पसंती ऑस्ट्रेलियाला दिली आहे, असं आर. अश्विन याने यूट्यूब चॅनेलला सांगितलं.