
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर माजी कर्णधार कपिल देव यांनी एका निर्णयावरून नाराजी व्यक्त केली आहे. रोहितचा तो निर्णय अचानक या वर्ल्ड कपवेळी का बदलला असा सवाल कपिल देव यांनी उपस्थित केला आहे.

रोहित शर्मा याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला पहिली ओव्हर दिली आहे. रोहितच्या या निर्णयावर कपिल देव यांनी बोट ठेवलं आहे.

जसप्रीत बुमराह याने पहिली ओव्हर टाकायला हवी. भारतीय संघाचा तो विकेट घेणारा मुख्य गोलंदाज आहे. मी रोहितला ज्यावेळी भेटेल तेव्हा त्याला विचारणार आहे की यामागे त्याचा विचार काय आहे. आपण बाहेरून काहीही अंदाज बांधू शकतो. मात्र मी जितकं बुमराहला पाहिलं आहे त्यावरून तरी त्यालाच ओव्हर द्यायला हवी, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचं प्रमुख अस्त्र असलेल्या बुमराहला सुरूवातीला ओव्हर देण्यात येत नाहीये. बुमराह पॉवरप्लेमध्ये पाचवी ओव्हर वर्ल्ड कपमध्ये टाकत आहे.

रोहित शर्माने यंदा अर्शदीप सिंहकडून बॉलिंग सुरू केली आहे. पाकिस्तान आणि आयर्लंडविरूद्ध अर्शदीप सिंह याने पहिली ओव्हर टाकली होती.