
सध्या वजन कमी करण्यासाठी अनेक लोक विविध युक्त्या लढवत असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण रात्रीच्या जेवणात भात खावा की चपाती, असा प्रश्न अनेकदा विचारतात. भारतातील प्रत्येक घरात चपाती आणि भात दोन्हीही जेवणाचा अविभाज्य भाग मानला जातो. हे पूर्णपणे टाळणं अनेकांना अशक्य असते.

पण काळजी करू नका. योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पर्यायांचा वापर करून तुम्ही भात आणि चपाती दोन्हीही खाऊन तुम्हाला वजन कमी करता येते. आज आपण वजन कमी करण्यासाठी पोळी आणि भात यापैकी कोणता पर्याय अधिक चांगला आहे, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

चपाती आणि भात या दोन्ही धान्यांचे पौष्टिक गुणधर्म वेगवेगळे असतात. गव्हापासून बनलेल्या चपात्यांमध्ये फायबर, प्रोटीन आणि फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारख्या महत्त्वाची खनिजे मिळतात. याउलट तांदळावर प्रक्रिया केल्यामुळे त्यातील कोंडा आणि बाहेरील थर काढून टाकला जातो, ज्यामुळे त्याचे बहुतांश पोषक घटक नष्ट होतात.

यामुळे तांदळात कॅलरी आणि पोषक तत्वांचे प्रमाण कमी आढळते. मात्र तांदळात सोडियमचे प्रमाण कमी असल्याने ते उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. चपाती आणि भात दोन्हीही आपापल्या जागी फायदेशीर मानले जातात. मात्र, वजन कमी करणाऱ्यांसाठी त्यांचे प्रमाण आणि जेवणाची वेळ अत्यंत महत्त्वाची असते.

जर तुम्हाला रात्रीचे जेवण हलके ठेवायचे असेल, तर एक दिवस पोळी आणि एक दिवस भात असं आलटून पालटून खाऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्रीचे जेवण शक्यतो ८ च्या आधी करा. यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच तुमच्या झोपेवर कोणताही परिणाम होत नाही.

रात्री जास्त प्रमाणात कार्ब्स घेतल्याने पोट फुगल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे पोषक तत्वांच्या शोषणातही अडथळा येऊ शकतो. गहू, बाजरी, ज्वारी किंवा नाचणीसारख्या धान्यांपासून बनलेली चपाती, भाकरी केवळ पौष्टिक नसते, तर त्यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहते.

चपातीतील फायबरमुळे तुमचे पचन सुधारते. तसेच तुम्हाला लवकर भूक लागत नाही. तिचे पचन हळूहळू होत असल्याने रक्तातील साखर (ब्लड शुगर) देखील स्थिर राहते. विशेष म्हणजे, चणाडाळ किंवा मूगडाळीच्या पिठापासून पोळी बनवल्यास त्यातील प्रथिनांचे प्रमाण आणखी वाढते.

मात्र, चपातीला जास्त तूप किंवा तेल लावल्यास तिच्या कॅलरीज वाढतात, त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भातात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला त्वरित ऊर्जा देतात. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या किंवा व्यायाम करणाऱ्या लोकांना भात खाणे विशेषतः उपयुक्त ठरते.

भातात चरबी आणि कोलेस्टेरॉल खूप कमी असल्याने ते हृदयासाठी चांगले मानले जाते. पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस हा फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने अधिक चांगला पर्याय आहे. पांढरा भात रक्तातील साखर लवकर वाढवतो. त्यामुळे भात मर्यादित प्रमाणात प्रथिने किंवा फायबरयुक्त पदार्थांसोबत खाणे महत्त्वाचे आहे.

वजन कमी करताना काय खात आहोत यापेक्षा किती खात आहोत हे अधिक महत्त्वाचे आहे. एका वेळी अर्धी वाटी भात किंवा दोन चपात्या हा आहार पुरेसा मानला जातो. चपातीच्या तुलनेत भात लवकर पचतो, पण त्यामुळे लवकर भूक देखील लागते.

याउलट, चपातीमधील फायबर आणि प्रोटीनमुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. जर भात खायचाच असेल, तर तो हलका असावा. त्यासोबत पुरेशा प्रमाणात भाज्या असाव्यात, ज्यामुळे आहारात संतुलन राहील.

वजन कमी करण्यासाठी पोळी किंवा भात यापैकी कोणतीही गोष्ट पूर्णपणे सोडू नये. या दोन्हीही गोष्टी मर्यादित प्रमाणात आणि योग्य पोषणाच्या संतुलनासह आहारात समाविष्ट केल्यास वजन कमी करणे सोपे होईल. जर तुम्ही दिवसभर शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल, तर तुम्ही जास्त भात घ्यावा. पण जर तुम्ही जास्त सक्रिय नसाल, तर मल्टीग्रेन किंवा जास्त फायबर असलेल्या चपात्या खाणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.