मतदानाच्या दोन दिवस आधीच राणेंच्या पक्षाला रत्नागिरीत मोठं खिंडार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना, रत्नागिरी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांच्या पक्षाला जबरदस्त खिंडार पडली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष यांच्यासह 18 पदाधिकाऱ्यांना शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांना दणका बसला […]

मतदानाच्या दोन दिवस आधीच राणेंच्या पक्षाला रत्नागिरीत मोठं खिंडार
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना, रत्नागिरी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांच्या पक्षाला जबरदस्त खिंडार पडली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष यांच्यासह 18 पदाधिकाऱ्यांना शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांना दणका बसला आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. 23 एप्रिल रोजी म्हणजे परवा या मतदारसंघात मतदान होणार आहे. त्याआधीच शिवसेनेने नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला जबरदस्त धक्का देत, रत्नागिरीत पक्षाला पार खिंडार पाडली आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे आणि महिला जिल्हाध्यक्ष मेघना शिंदे यांनी शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार आणि उमेदवार विनायक राऊत यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे, जिल्हाध्यक्षांसोबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे गुहागर तालुकाध्यक्ष, खेडा तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षांसह एकूण 18 बड्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्षाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

एकंदरीत रत्नागिरीत नारायण राणेंच्या महारष्ट्र स्वाभिमान पक्षातील बहुतेक बडे नेते शिवसेना आणि भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे पक्षाला मोठी खिंडार पडली असून, याचा फटका येत्या मतदानावर पडेल, हे नक्की.

रत्नागिरी सिंधुदुर्गातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून माजी खासदार डॉ. निलेश राणे, शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, तर काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांची लढत होणार आहे. मात्र, मुख्य लढत निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत अशीच असेल. ‘राणे विरुद्ध शिवसेना’ अशा सामन्याचीही किनार या लढतीला आहे. त्यात शिवसेनेने राणेंच्या पक्षातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच बडे नेते गळाला लावल्याने येत्या निवडणुकीत राणेंना मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.