मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाचा पेपर इतक्यात फोडणार नाही, आदित्य ठाकरेंचं मौन

| Updated on: Aug 28, 2019 | 8:31 AM

आमची युती सत्तेसाठी नसून हिंदुत्वासाठी आहे, कुणाच्या किती जागा हे महत्त्वाचं नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नागपुरातील जनआशीर्वाद यात्रेवेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाचा पेपर इतक्यात फोडणार नाही, आदित्य ठाकरेंचं मौन
Follow us on

नागपूर : शिवसेना-भाजप (Shivsena BJP) विधानसभा निवडणुकांना युतीमध्ये सामोरे जाणार का, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपद (CM and Deputy CM) आणि जागावाटपाचं गणित कसं सोडवणार, या प्रश्नांची उत्तर तूर्तास मिळण्याची शक्यता दिसत नाही. कारण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाचा पेपर इतक्यात फोडणार नाही, असं म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकारांचा प्रश्न टोलवला. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या (Jan Ashirvad Yatra) तिसऱ्या टप्प्याची सुरुवात नागपुरातून झाली.

आमची युती सत्तेसाठी नसून हिंदुत्वासाठी आहे, कुणाच्या किती जागा हे महत्त्वाचं नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. युती होणार की नाही हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोडवतील, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी हात वर केले.

सत्तेत असूनही तुम्ही जनसमस्यांवर आंदोलन कसं करता? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. जनसमस्यांची सोडवणूक करण्यासाठी आवाज उठवणे हे विरोधकांचं काम आहे, पण राज्यात विरोधी पक्ष शिल्लक आहे कुठे? असा प्रतिप्रश्न आदित्य ठाकरेंनी केला. विरोधक गोंधळलेले असल्यामुळे त्यांचं काम आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार कृपाल तुमाने, खासदार राजन विचारे, माजी आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.

संजय राऊत यांच्या मनातला मुख्यमंत्री

आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी हा महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या इतिहासातला महत्वाचा निर्णय आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याबाबत निर्णय घेतील. पण मला तुम्ही वैयक्तिक मत विचाराल, तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून तरुण, तजेलदार चेहऱ्याची गरज आहे. जो तरुण महाराष्ट्राला, तरुणांना दिशा देऊ शकतो… महाराष्ट्रतील लोकही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त दोन महिन्यांपूर्वी व्यक्त केलं होतं.

शिवसेना-भाजप यांच्या युतीत विधानसभेच्या जागावाटपावरुन धुसफूस सुरु असल्याचं बोललं जातं. मात्र दोन्ही पक्षांचे नेते हसतमुखाने ‘आमचं ठरलंय’ असं सांगतात. त्यामुळे नेमकं काय होणार, हे येत्या काळात समजेल.