‘नाईटलाईफसाठी स्वारी सातच्या आत घरी’ आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणारा कवी मनाचा नेता कोण?

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन घमासान! शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आणि राजकीय वातावरण तापलं!

नाईटलाईफसाठी स्वारी सातच्या आत घरी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणारा कवी मनाचा नेता कोण?
नाशिक दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांसोबत आदित्य ठाकरे
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Oct 27, 2022 | 5:37 PM

ठाणे : शिदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केलीय. आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आज नाशिकमध्ये (Nashik) पाहणी केली. या दौऱ्यावरुन आता विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर कवितेतून टीका केली. ‘राजकुमार आता घराबाहेर पडले’ असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला. ते ठाण्यात (Thane News) पत्रकारांशी बोलत होते.

नेमकं नरेश म्हस्के यांचं वक्तव्य काय?

नरेश म्हस्के यांनी कवितेतून आदित्य ठाकरे यांना टोला लगावत म्हटलं की,…

असे कसे बरे दादा नवलपरी घडले
राजकुमार आता घराबाहेर पडले

अर्ध्या तासात शेतकऱ्यांची दैना पाहून झाली
नाईट लाईफसाठी स्वारी सातच्या आत परतली घरी

वांद्रेतील माणूस बांधावर कधी जातो आणि बांधावरुन पुन्हा वांद्रेत कधी परत येतो, हे कळत नाही. हे लक्झरीअर दौरे आहेत, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे.

ज्यावेळी तुमच्या हातात सत्ता होता, तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं, तुम्ही घराबाहेर पडलात का, असं प्रश्नही त्यांनी केला.

पाहा व्हिडीओ :

केवळ  सरकारच्या कामांमध्ये अडथळे आणायचे आणि प्रसिद्धी करता आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्याकरता ठाकरेंकडून उद्योग चाललेले आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आपला दौरा राजकीय नसून शेतकऱ्यांच्या नुकसानीही पाहणी करण्यासाठी असल्याचं म्हटलं होतं. या दौऱ्यात कोणतंही राजकारण आणण्याची इच्छा नाही, फक्त सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचवावी, असं आदित्य ठाकरेंनी दौऱ्यादरम्यान म्हटलं होतं.

त्यावर नरेश म्हस्के यांनी निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारने केलं असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडी काळात शेतकऱ्यांसाठी झालेल्या घोषणांची पूर्तता झाली का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

25 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देऊ, अशी घोषणा महाविकास आघाडीने केली होती, पण दिले का? असा सवालही नरेश म्हस्के यांनी विचारला.

आदित्य ठाकरे हे आज नाशिक आणि पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नाशिकमधील शेतकऱ्यांची भेट घेतली. नाशिकमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा त्यांनी या दौऱ्यादरम्यान आढावा घेतला.