Ajit Pawar : दिल्लीवरुन सिग्नल मिळत नाही तोवर काहीही घडणार नाही, मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजितादादांचा पुन्हा टोला; तर कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला

| Updated on: Aug 06, 2022 | 4:47 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खातेवाटप कधी हा प्रश्न केला की ते फक्त लवकरच इतकी प्रतिक्रिया देतात, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावलाय. तसंच दिल्लीवरुन जोवर सिग्नल मिळत नाही तोवर त्यांच्या हातून काहीही घडणार नाही, अशी टीकाही अजितदादांनी यावेळी केलीय.

Ajit Pawar : दिल्लीवरुन सिग्नल मिळत नाही तोवर काहीही घडणार नाही, मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजितादादांचा पुन्हा टोला; तर कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला
अजित पवार, विरोधी पक्षनेते
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : राज्यात शिंदे सरकार येऊन 36 दिवस उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होऊ शकलेला नाही. अशास्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधलाय. राज्यात महिना उलटूनही कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री मिळत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) खातेवाटप कधी हा प्रश्न केला की ते फक्त लवकरच इतकी प्रतिक्रिया देतात, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावलाय. तसंच दिल्लीवरुन जोवर सिग्नल मिळत नाही तोवर त्यांच्या हातून काहीही घडणार नाही, अशी टीकाही अजितदादांनी यावेळी केलीय.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या हस्ते आज पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी अजितदादा म्हणाले की, कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. सत्ता येते आणि जाते. राज्यात आताही सत्तेत बसलेले सत्तेवर किती काळ राहतील हे सांगता येत नाही. आगामी काळात जिल्हा परिषद, तालुकपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. ओबीसी समाजाला या निवडणुकांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहीत इतर राजकीय पक्षाचाही प्रयत्न होता. याला सुप्रीम कोर्टात यश मिळाले. आता निवडणुका कधीही लागल्या तरी पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नाही याचा विचार सर्वांनी करायला हवा, असं आवाहन अजितदादांनी केलंय. तसंच सचिन शिंदे यांनाही पुढील वाटचालीसाठी अजित पवारांनी शुभेच्छा दिल्या.

‘दिल्लीतून सिग्नल मिळत नाही तोवर यांच्या हातून काहीही घडणार नाही’

कोणत्याही अडचणीत काम करण्याची जिद्द बाळगा. संकटे कितीही आली, आव्हान कितीही आले तरी त्यावर निर्धाराने सामना करण्याची महाराष्ट्राची परंपरा आपण जपायची आहे, असे त्यांनी सांगितले. आज राज्यात महिना उलटूनही कोणत्याही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खातेवाटप कधी हा प्रश्न केला की ते फक्त लवकरच इतकी प्रतिक्रिया देतात, असा खोचक टोला अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. राज्यात अनेक अडचणी आणि प्रश्न आहेत यावर निर्णय घेणार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिल्लीतून जोवर सिग्नल मिळत नाही तोवर यांच्या हातून काहीही घडणार नाही, अशी टीकाही अजितदादांनी यावेळी केली.

‘शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने देशाला पुढे घेऊन जायचं आहे’

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या विषयी बोलताना अजितदादा म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात मोठमोठे नेत्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता स्वत:ला झोकून दिले. यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले या गोष्टीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा क्षण आपण अतिशय आनंदाने साजरा करूया. देशातील सर्वधर्म समभाव याच भूमिकेतून आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने देशाला पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्याला करायाचे आहे. त्याला कुठेही गालबोट लागू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, असे आवाहन अजितदादा यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.