नेम कुणाचा, गेम कुणावर? शिवसेना, राष्ट्रवादी की अजित पवार?

| Updated on: Nov 23, 2019 | 5:48 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारची सकाळ भूकंप घडवत उजाडली. अर्धा महाराष्ट्र झोपेत असताना, भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट संपुष्टात (ajit pawar maharashtra politcs) आली.

नेम कुणाचा, गेम कुणावर? शिवसेना, राष्ट्रवादी की अजित पवार?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारची सकाळ भूकंप घडवत उजाडली. अर्धा महाराष्ट्र झोपेत असताना, भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट संपुष्टात (ajit pawar maharashtra politcs) आली. ते तुलनेनं तितकंस विशेष नव्हतं. कारण भल्या पहाटेच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (ajit pawar maharashtra politcs) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दोघांनी शपथ घेतली याचा विश्वास आज दिवसभर अनेकांना बसला नाही. गेली महिनाभर जे राजकारण सुरु होतं, त्याच्या 360 अंशविरोधात हे घडलं होतं. कुणीतरी कुणाचा गेम केला होता, नेमका कुणाचा गेम झाला याचीच चर्चा गावोगावी, गल्लोगल्ली, सुरु होती.

तीर ऐसा लगा दर्द ऐसा जगा..चोट दिल पे ओ खायी मजा आ गया…नुसरत फते अली खान यांच्या या ओळी महाराष्ट्राच्या राजकीय सद्यस्थितीला चपखल बसत आहेत. मात्र या ओळी नेमक्या कुणासाठी आहेत, याचाच अंदाज राजकीय विश्लेषकांपासून गावखेड्यातल्या सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण बांधत आहे… नेमका तीर कुणी मारला, कुणाला मारला आणि नेमकी जखम कुणाच्या काळजावर झाली, नेम कुणाचा आणि गेम कुणाचा झाला?

1)  शिवसेनेचा गेम झाला का?

ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी भाजपची साथ सोडून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, त्या शिवसेनेचा गेम झाला, अशी सर्वप्रथम भावना सर्वांचीच झाली. कारण कालपर्यंत चर्चेत अग्रस्थानी असणारे अजित पवार, आज भाजपला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री झाले होते. महत्त्वाचं म्हणजे हा गेम शरद पवारांनीच केला अशी शंका सर्वांच्याच मनात आली. मात्र संजय राऊत यांनी शरद पवार असं करणार नाहीत हे निक्षून सांगितलं.

शिवाय शरद पवारांनीही उद्धव ठाकरेंसोबत पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांचं हे कृत्य कारवाईस पात्र असल्याचं म्हटलं..

 2)  राष्ट्रवादीचा गेम झाला का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेत्यानेच पक्षाला अंधारात ठेवून, भाजपला पाठिंबा दिला. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना हाताशी घेऊन राजभवन गाठलं… आणि थेट स्वत: उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचा स्वत:चाच गेम झाला का असाही प्रश्न आहे. अजित पवारांनी स्वत:च राष्ट्रवादीचा गेम केल्याची चर्चा रंगली.

जर शरद पवार महिनाभर पक्षातर्फे शिवसेना-काँग्रेसशी बोलणी करत असतील, त्याचवेळी अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने, राष्ट्रवादीचाच गेम झाला का अशीही चर्चा सुरु झाली.

  3)  भाजपचा गेम झाला?

भाजपने अजित पवारांचा पाठिंबा घेऊन, थेट शपथविधी आटोपून घेतला. मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यामुळे भाजपने सर्वांचा गेम केला अशी आज सर्वांची धारणा झाली.. पण भाजपला 30 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करायचं आहे.

आज शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, भाजपला एकप्रकारे बहुमत सिद्ध करुन दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता भाजपचा गेम झालाय का हे पाहावं लागणार आहे.

 4)  अजित पवारांचा गेम झाला?

भल्या पहाटे अजित पवारांनी भाजपच्या गोटात जाऊन पद मिळवलं… पण राष्ट्रवादीतून गद्दारी केल्याने, त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली…. स्वत: शरद पवारांनी अजित पवारांवर आमदारांच्या सह्यांचा गैरवापर केल्याचा आरोप केला…

अजित पवारांनी राष्ट्रवादीशी जर धोकेबाजी केली असेल, तर त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का आपसूक बसेल. जर त्यांनी पुन्हा घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ मोडून, राष्ट्रवादीच्या बाजूनेच राहायचं ठरवलं, तरी जी बूँद से गेली आहे, ती हौदसे परतणार नाही…

शिवाय भविष्यात जर महासेनाआघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आलं तर अजित पवारांच्या नावाला पक्षातूनच विरोध होईल… सुप्रिया सुळेंचं नाव आपसूक पुढे केलं जाईल…