‘मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…!’ अजितदादांचा पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांना टोला

| Updated on: Jun 04, 2021 | 10:07 PM

अजित दादा यांनी 'मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार', असं वक्तव्य केलं.

मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय...! अजितदादांचा पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांना टोला
उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us on

अश्विनी सातव-डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 29 मे रोजी केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा टोला हाणलाय. ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर अजित दादा यांनी ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार’, असं वक्तव्य केलं. अजितदादांच्या या उत्तरानं तिथं उपस्थित पत्रकारांनाही हसू आवरलं नाही. अजित पवार यांनी यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी विचारला होता. (Ajit Pawar’s reply to Chandrakant Patil’s claim that government will fall)

“चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय. अमकंय तमकंय… कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे. ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव…. कितीदा सांगायचं की हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही”, असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलाय.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले.. केसाने गळा कापणे म्हणतात तसे.. तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकारपरिषदेत म्हटले होते.

वारीसाठी स्वतंत्र कमिटी नियुक्त

आषाढी वारीबाबतही अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वारीसंदर्भात एक कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. कुंभ मेळ्यानंतर कोरोनाचं संकट वाढल्याचं आपण पाहिलं. वारकऱ्यांनाही ते समजून सांगण्यात आलं. पण वारकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून अजून एक संधी देऊन पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी समिती गठीत केली आहे. विभागीय आयुक्त, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा समावेश या कमिटीमध्ये असेल. या कमिटीचा निर्णय आल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वारीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजितदादांनी दिलीय.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार

‘पालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती’, भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

Ajit Pawar’s reply to Chandrakant Patil’s claim that government will fall