नांदेडमधील एकूण एक पदाधिकाऱ्याचा राजीनामा

| Updated on: Jun 07, 2019 | 4:24 PM

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नांदेडमधील काँग्रस जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

नांदेडमधील एकूण एक पदाधिकाऱ्याचा राजीनामा
Follow us on

नांदेड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नांदेडमधील काँग्रस जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच आपले राजीनामे स्वीकारुन तात्काळ नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली.

अशोक चव्हाण यांचा पराभव स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागल्यानेच त्यांनी अशाप्रकारे सामुहिक निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच आपला राजीनामा दिल्याचे सांगितले होते. तसेच आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. राहुल गांधी यांनीही लोकसभा निकालानंतर काँग्रेस कार्यकारीणीकडे आपला राजीनामा सोपवला होता. मात्र, पक्षाने त्यांचा राजीनामा नाकारला. त्यानंतर राहुल गांधींनी पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत दिले होते.

अशोक चव्हाण यांच्याच नेतृत्त्वात राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात 2014 साली नांदेड आणि हिंगोली येथील 2 जागा विजयी झाल्या होत्या. यावर्षी काँग्रेसला याही जागा राखता आल्या नाहीत. केवळ चंद्रपुरात शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला. अशोक चव्हाण यांनाही स्वत:ची नांदेडची जागा राखता आली नाही. हिंगोलीतून राजीव सातव लढले नाहीत, मात्र सुभाष वानखेडे यांनाही हिंगोलीची जागा काँग्रेसकडे आणता आली नाही.

अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत काँग्रेसने राज्यात चांगली कामगिरी केल्याचे उदाहरण नाही. त्यात लोकसभा निवडणुकीत तर राज्यात काँग्रेसने 48 पैकी केवळ एक जागा जिंकत लाजीरवाणी कामगिरी केली. त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.