महाराष्ट्र सरकार कुठे आहे? अमित शाहांचा घणाघात, मुख्यमंत्र्यांवर टीका आणि प्रकृती स्वास्थ्यासाठीही प्रार्थना

अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांची तब्येत ठिक नाही. पण जेव्हा ठिक होती तेव्हा तरी कुठं बोलले. मी प्रार्थना करतो की त्यांची तब्येत ठिक व्हावी. महाराष्ट्रातील सरकार कुठे आहे? लोक शोधत आहेत, असा घणाघात शाह यांनी केलाय.

महाराष्ट्र सरकार कुठे आहे? अमित शाहांचा घणाघात, मुख्यमंत्र्यांवर टीका आणि प्रकृती स्वास्थ्यासाठीही प्रार्थना
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 7:08 PM

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र सरकार कुठे आहे? असा खोचक सवाल करतानाच हे तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार आहे आणि आता या ऑटोची चाकं पंक्चर झाली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केलाय. पुण्यातील महत्वाच्या कार्यक्रमानंतर शाह यांनी भाजप कार्यकर्ता संमेलनात मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी पुणे महापालिकेवर भाजपला झेंडा कायम राहणार असल्याचा दावाही केलाय.

अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांची तब्येत ठिक नाही. पण जेव्हा ठिक होती तेव्हा तरी कुठं बोलले. मी प्रार्थना करतो की त्यांची तब्येत ठिक व्हावी. महाराष्ट्रातील सरकार कुठे आहे? लोक शोधत आहेत, असा घणाघात शाह यांनी केलाय. तसंच सत्तास्थापनेवेळी बोलणं झालं होतं. मी होतो. निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. पण नंतर उलटले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप शाह यांनी यावेळी केलाय.

‘सरकारची 3 चाकी रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काही बाहेर पडत नाही’

महाराष्ट्रातील सरकार तीन चाकाची रिक्षा आहे. या रिक्षाचे तिन चाकं तीन दिशेला आहेत. अन आता तिन्ही चाकं पंक्चर झाली आहे. जेव्हा ही रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काहीही बाहेर पडत नाही, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केलीय. येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष्य कमी ठेवू नका. पुण्यातील जनता तुम्हाला भरभरुन द्यायला तयार आहे, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अर्थ महाविकास आघाडीने दुसराच घेतला’

पंतप्रधान मोदी यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना सुरु केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याची नवी व्याख्या बनवली. काँग्रेसनं त्यातील डी पकडला. त्यांनी डायरेक्ट ऐवजी डिलर शब्द घेतला. शिवसेनेने बी चा अर्थ ब्रोकर असा घेतला आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफरमध्ये कटमनी सुरु केला. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो हे डिलर, ब्रोकर आणि ट्रान्सफरचा बिझनेस म्हणतात. मग महाराष्ट्राला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हवं की डिलर, ब्रोकर आणि ट्रानस्फरमध्ये कटमनी घेणारं सरकार हवं? असा सवाल शाह यांनी केलाय.

हिंमत असेल तर दोन हात करा, शाहांचं आव्हान

ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. ते म्हणाले होते की, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. दुसरी शिवसेना असं म्हणते की सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, कोणत्याही प्रकारे आम्ही तो घेणार. मी आजही सांगतो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, दोन हात करा. तिन्ही पक्ष सोबत या, भाजपचा कार्यकर्ता लढण्यासाठी तयार आहे, असं थेट आव्हानच शाह यांनी यावेळी महाविकास आघाडीला केलं.

इतर बातम्या :

पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अमित शाहांची पुणेकरांना ग्वाही

कर्जत नगर पंचायत निवडणूक : रोहित पवारांची सोमय्यांवर खोचक टीका, चंद्रकांत पाटलांनाही प्रत्युत्तर