खैरेंविरोधात एल्गार, असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस तळ ठोकणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

औरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबादचे उमेदवार आणि विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पाचव्यांदा संसदेत जाण्याचा मार्ग दिवसेंदिवस खडतर होतोय. एमआयएमने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस मुक्कामी असतील. या काळात ते कॉर्नर बैठका, घरोघरी जाऊन भेटी, रॅली आणि प्रचारसभाही घेणार आहेत. एमआयएम आणि भारिप यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादेतून एमआयएमचे […]

खैरेंविरोधात एल्गार, असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस तळ ठोकणार
Follow us on

औरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबादचे उमेदवार आणि विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पाचव्यांदा संसदेत जाण्याचा मार्ग दिवसेंदिवस खडतर होतोय. एमआयएमने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी औरंगाबादेत चार दिवस मुक्कामी असतील. या काळात ते कॉर्नर बैठका, घरोघरी जाऊन भेटी, रॅली आणि प्रचारसभाही घेणार आहेत. एमआयएम आणि भारिप यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादेतून एमआयएमचे विद्यमान आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नांदेडमध्ये सभा घेतल्यानंतर ओवेसी औरंगाबादचा दौरा सुरु करणार आहेत. मंगळवारी रात्रीच ते कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहेत. 16 ते 19 एप्रिल या काळात ओवेसींकडून प्रचार केला जाईल. एमआयएमचा मतदार असलेला मुस्लीम समाज औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. औरंगाबाद महापालिकेत एमआयएमने घवघवीत यश मिळवलं होतं. पण ग्रामीण भागातलं चित्र कसं असेल याबाबत अस्पष्टता आहे.

चंद्रकांत खैरेंसमोरच्या अडचणी वाढल्या

शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना औरंगाबादेत अपक्ष, काँग्रेस आणि एमआयएमचं आव्हान असेल. कारण, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी पाठिंबा दिलाय, शिवाय वेरुळ मठाच्या शांतीगिरी महाराजांनीही हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जाधव यांनी सक्रिय भूमिका घेतली होती. त्यानंतरच शिवसेनेतून बाहेर पडत त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसकडून मोठी टक्कर मिळण्याची शक्यता नसली तरी एमआयएम मात्र तगडं आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे.

औरंगाबादसाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान होईल. या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 जागांसाठी मतदान होणार आहे.