नाना पटोले यांना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या नेत्याची ‘लेटर बॉम्ब’ने राष्ट्रीय अध्यक्षांकडे मागणी

नाना पटोले (president nana patole) यांच्या कार्यकाळात पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे त्यांना त्वरित पदावरुन हटवावे, असे निवेदन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले आहे.

नाना पटोले यांना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या नेत्याची लेटर बॉम्बने राष्ट्रीय अध्यक्षांकडे मागणी
नाना पटोले
Image Credit source: social media
| Updated on: Jan 18, 2023 | 8:57 AM

नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये आता घमासान सुरु झाले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात पक्षातील ज्येष्ठ नेते सक्रीय झाले आहे. आता त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. नाना पटोले (president nana patole)यांच्या कार्यकाळात पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे त्यांना त्वरित पदावरुन हटवावे, असे निवेदन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना दिले आहे.
काँग्रेसच्या नेत्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फेब्रवारी २०२१ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्यांकडे सोपवण्यात आली. त्यांनी सूत्र घेतल्यानंतर पक्षात उतरती कळा लागली. नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली. त्याला पटोले हेच कारणीभूत आहे. विधान परिषदेत सत्यजित तांबेसारखे अपक्ष उमेदवार निवडून आले तर सभापतिपदाचा तिढा तयार होईल. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर आला आहे. आता तर शिंदे गटामुळे पक्ष पाचव्या क्रमांकावर जाईल. ज्या पक्षाची पाळेमुळे शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत रोवली गेली होती, आता त्या पक्षाकडे कार्यकर्ते नाहीत, असा आरोप माजी आमदार व काँग्रेस समितीचे सदस्य आशिष देशमुख (ashish deshmukh)यांनी केला आहे.

काँग्रेसमध्ये भूंकप होणार
नाना पटोले यांच्या विरोधात जाणारे आशिष देशमुख यांच्या आरोपवर बोलण्यास नाना पटोले यांनी नकार दिला. त्याचवेळी काँग्रेसमध्ये भूंकप होणार असल्याचा दावा भाजपचे खासदार सुजय विखेपाटील यांनी केला. सुजय विखे म्हणाले की, काँग्रेसमध्ये लवकरच भूकंप होणार आहे. काँग्रेसचे ठरावीक लोकच मलिदा खात आहेत. शिवसेनेच्या आमदारांमध्ये जशी धुसफूस होती, तशीच अस्वस्थता काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे. त्यांचे स्वत:चे मंत्री देखील आमदारांची कामं करत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत तुम्ही पाहालच. भविष्यात काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल. राज्यातील जनताही पाहिल. ही तर सुरुवात असेल, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

नेत्यांनी स्वत:चे घर आणि प्रपंच वाढवला:

प्रत्येकजण आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहे, हेच काँग्रेसचे पहिल्यापासूनचे दुर्देव आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सत्ता भोगूनही पक्षाला काहीच योगदान दिलं नाही. फक्त स्वत:चे घर आणि प्रपंच वाढवला. नव्या पिढीला वारंवार नाकारून त्यांना लांब केलं गेलं. कोणते आमदार बाहेर पडणार? ते कोणत्या पक्षात जाणार याविषयी सुजय विखे यांनी सस्पेन्स ठेवला आहे. त्यावर त्यांनी काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.