याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी : आशिष शेलार

| Updated on: Sep 09, 2020 | 12:24 PM

अनधिकृत बांधकाम थांबवणे ही भाजपची भूमिकाच नाही. पण आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा ठाकरे सरकारचा कारभार आहे, असे शेलार म्हणाले.

याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, पण कंगनावर कारवाई, ठाकरे सरकार अहंकारी : आशिष शेलार
Follow us on

मुंबई : “अभिनेत्री कंगना रनौतच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत होते, तर इतकी वर्ष कारवाई का झाली नाही, याकूब मेमनच्या घरावर कारवाई केली नाही, पण कंगनाला नोटीस दिल्यावर अवघ्या 24 तासात झालेली कारवाई ही सूडबुद्धीने आहे” असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. “मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी” या नवीन योजनेप्रमाणे ठाकरे सरकार काम करत असल्याचा निशाणाही त्यांनी साधला. (Ashish Shelar on BMC demolishing Kangana Ranaut Office)

“मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी करायची झाल्यास ती खूप मोठी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या वांद्रे स्थानकाशेजारील बहुमजली झोपडपट्ट्याही अनधिकृत आहेत. मग त्यावर कारवाई का झाली नाही? भाजप उद्यापासून महापालिकेला मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी पाठवेल, आणि त्यांच्यावर 24 तासात कारवाई होते का, याचा पाठपुरावा करेल” असे आशिष शेलार म्हणाले.

“सुडाच्या भावनेने ही कारवाई होताना दिसत आहे. अनधिकृत बांधकाम थांबवणे ही भाजपची भूमिकाच नाही. पण आमच्या सोबत राहिलात तर कारवाई नाही आणि सोबत नसाल तर कारवाई असा ठाकरे सरकारचा कारभार आहे. कंगनाच्या ऑफिसचे बांधकाम अनधिकृत असेल, तर जशी तत्परता तोडकाम करताना दाखवली, तीच भूमिका इतरांच्या बाबतीतही असायला हवी” असे शेलार म्हणाले.

“मुंबई महापालिकेचा गौरवशाली इतिहास प्रश्नांकित करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. ठाकरे सरकार अहंकारी आहे. ‘मी आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी’ या नवीन योजनेप्रमाणे ते काम करत आहेत” असा घणाघात त्यांनी केला.

“मुंबई किंवा महाराष्ट्र यांची तुलना पाकिस्तान अथवा पाकव्याप्त काश्मीरशी करणे चुकीचेच आहे. भाजप कंगनाच्या त्या भूमिकेशी असहमत असल्याचे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे.” असेही शेलार म्हणाले. (Ashish Shelar on BMC demolishing Kangana Ranaut Office)

“लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे यावर भाजपचा विश्वास आहे पण शिवसेनेने वापरलेले तिन्ही शब्द त्यांच्याच तोंडावर येऊन पडत आहेत. संजय राऊत यांनीच काळे लिखाण केले असल्याने डांबराची उपमा दिली.” असे आशिष शेलार म्हणाले.

“ज्या बॉम्बस्फोटच्या साखळीने मुंबई हादरली त्या याकूब मेमनच्या घरात बीएमसी घुसली नाही, याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या माणसाला पालकमंत्री केलं, ज्यांनी कसबला बिर्याणी खाऊ घातली त्या काँग्रेसला प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही” असेही आशिष शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या :

बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

‘कंगनापासून दूर राहा’, गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे 9 फोन

(Ashish Shelar on BMC demolishing Kangana Ranaut Office)