Assembly Election Result 2022 : उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेना सपाटून पडली, संजय राऊत म्हणतात, अजून लढाई संपली नाही !

| Updated on: Mar 10, 2022 | 5:16 PM

भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. गोव्यात आणि उत्तर प्रदेशातही शिवसेनेचा एकही उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचं अभिनंदन करतानाच अजून लढाई संपलेली नाही, असं सूचक वक्तव्य केलंय.

Assembly Election Result 2022 : उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेना सपाटून पडली, संजय राऊत म्हणतात, अजून लढाई संपली नाही !
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात (Assembly Election Result 2022) पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झालाय. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) जागा कमी झाल्या असल्या तरी भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल. तर गोव्यातही (Goa) भाजपच बहुमताच्या अगदी जवळ आहे. अशावेळी भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसलाय. गोव्यात आणि उत्तर प्रदेशातही शिवसेनेचा एकही उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचला नाही. इतकंच नाही तर शिवसेनेच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कमही वाचली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचं अभिनंदन करतानाच अजून लढाई संपलेली नाही, असं सूचक वक्तव्य केलंय.

संजय राऊतांकडून आप, भाजपचं अभिनंदन

पंजाबमध्ये आप आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. या निकालाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंजाबमध्ये आपचा ऐतिहासिक आणि क्रांतीकारी विजय झाला. राजकारणात, लोकशाहीत जो जिंकतो त्याचं अभिनंदन करण्याची परंपरा आपल्या देशात आहे. त्यामुळे ज्या ज्या पक्षाचा विजय झाला त्यांचं मी शिवसेनेकडून अभिनंदन करतो. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेत होती तिथे त्यांचा मोठा पराभव झालाय. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा होती पण ते कमी पडले. पंजाबमध्ये लोकांना पर्याय मिळाला. दिल्लीत केजरीवालांनी जे काम केलं त्याचं त्यांना फळ मिळालं. भाजपचा जो विजय आहे तो त्यांच्या निवडणूक मॅनेजमेंटचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय.

‘विजय आणि पराजय हा अंतिम नसतो, ती सुरुवात असते’

पंजाबमध्ये भाजप हा राष्ट्रीय पक्ष, मोदी आणि शाहांचाच चेहरा, तरीही पंजाबमध्ये भाजपला कोणत्या प्रकारचं यश मिळालं याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात आमच्या पद्धतीने लढलो. ही लढाई चालू राहील. कोणत्याही निवडणुकीत विजय आणि पराजय हा अंतिम नसतो, ती सुरुवात असते. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधींना चांगला प्रतिसाद होता पण त्यांना यश मिळालं नाही. शिवसेना जिथे जिथे निवडणूक लढली, ही आमची सुरुवात आहे. भविष्यात न थांबता आम्ही काम करत राहू, असंही राऊत यावेळी म्हणाले.

राऊतांचा भाजपला खोचक सल्ला

या निकालामुळे भाजपला खूप मोठा विजय मिळाला असला तरी त्यांनी विजय पचवायला शिकलं पाहिजे. काहींना विजय पचवता येत नाही. त्यांना अजीर्ण होतं. त्यामुळे त्यांना सांगायचं आहे की विजय पचवा. त्या त्या राज्याच सुडाचं राजकारण न करता, राज्याचं, तिथल्या लोकांचं हित पाहा, असा खोचक सल्लाही राऊतांनी भाजपला दिलाय.

‘सर्व विरोधी पक्ष एकत्र बसून चर्चा करु’

उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांचं चांगलं मॅनेजमेंट झालं असतं. काँग्रेसला सोबत घेतलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. काँग्रेसला यापुढे त्यांच्या धोरणात बदल करावा लागेल. आम्ही गोव्यात एकत्र लढण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातही काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवावी अशी आमची अपेक्षा होती. भविष्यात आम्ही एकत्र विरोधी पक्ष देशभरात कशा प्रकारे काम करता येईल यासाठी एकत्र बसून चर्चा करु, असंही राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

इतर बातम्या :

2024 मोदींना कसं रोखणार? शरद पवारांनी ‘राष्ट्रीय फॉर्म्युला’ पत्रकारांसमोर मांडला, कधी अंमल होणार?

गोव्यात जे पर्रिकर, गडकरींना नाही जमलं ते फडणवीसांनी करुन दाखवलं! महाराष्ट्रात जोर वाढणार?