Aurangabad| विठ्ठलाच्या पूजेला देवेंद्रजी यावेत, राज्यातल्या सत्तानाट्याचे पडसाद औरंगाबादेत, भाजप कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

येत्या 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी आणि भाविकांच्या नजरा आता पंढरपूरातील वारीकडे लागल्या आहेत. कोरोना संकटानंतर यंदा प्रथमच मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत.

Aurangabad| विठ्ठलाच्या पूजेला देवेंद्रजी यावेत, राज्यातल्या सत्तानाट्याचे पडसाद औरंगाबादेत, भाजप कार्यकर्त्यांची बॅनरबाजी
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 23, 2022 | 1:04 PM

औरंगाबादः राज्यात सत्ताबदलाचं वादळ आलं असताना अनेक जिल्ह्यांतून याचे पडसाद पहायला मिळत आहेत. औरंगाबादेत आज भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोठमोठे बॅनर्स लावले आहेत. आगामी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) विठ्ठलाच्या मुख्य पूजेचा मान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनाच मिळाला पाहिजे, अशी मागणी करणारे हे बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. राज्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकार असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वर्षा बंगला सोडला आहे. लवकरच ते राजीनामा देतील, अशीही दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माऊली तुझा आशीर्वाद राहू दे….

येत्या 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी आणि भाविकांच्या नजरा आता पंढरपूरातील वारीकडे लागल्या आहेत. कोरोना संकटानंतर यंदा प्रथमच मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची मुख्य पूजा करण्याचा मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असतो. सत्तेवर असलेले मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत असून भाजप कधीही सत्तास्थापनेचा दावा करू शकतं. याच पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. माऊली, तुझा आशीर्वाद राहू दे.. तुझ्या पंढरपूरच्या यात्रेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ देत… असा मजकूर या बॅनर्सवर लिहिला आहे. शहरातील जालना रोडवरील पूलाच्या खांबांवर हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांची राजीनाम्याची तयारी?

काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला भावनिक साद घातल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीतून वर्षा बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री नकोय, असं म्हणणाऱ्यांनी माझ्यासमोर येऊन सांगावं, मी राजीनामा पत्र हातात ठेवलंय, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर रात्रीतून त्यांनी आपल्या सामानासह वर्षा बंगला सोडला. आज दुपारी त्यांनी राज्यातल्या मुख्य सचिवांची एक बैठक बोलावली असून आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल या बैठकीत आभार मानले जातील. त्यानंतर मुख्यमंत्री राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.