बीडः बीड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) एक मोठा धक्का बसला आहे. ऊसतोड मजूर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षातील अनेक जण त्रास देतायत त्यामुळे मी पक्ष सोडत आहे. माझं वैर विठ्ठलाशी नाही मात्र मी पक्षातील बडव्यांमुळे त्रस्त झालोय. म्हणून मी वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शिवराज बांगर यांनी दिलीय. आज ते मुंबईत मनसेत (Maharashtra Navnirman Sena) जाहीर प्रवेश करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्यासह अनेकांनी मला त्रास दिल्याचा आरोप शिवराज बांगर यांनी केला आहे. बांगर यांच्या पक्ष सोडण्याने वंचित बहुजन आघाडीला राज्यातून मोठा खिंडार पडलं आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे माझ्यासाठी विठ्ठल आहेत, त्यांच्याबद्दल माझं काहीही वैर नाही मात्र मी बडव्यांमुळे त्रस्त झालोय अशी प्रतिक्रिया शिवराज बांगर यांनी दिलीय.
वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांवर नाराज असलेले शिवराज बांगर म्हणाले, मी 2019 ला शिवसेना पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडीत आलो. बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली. अचानकपणे माझी उमेदवारी काढून दुसरा उमेदवार दिला. पण मी प्रामाणिकपणे काम केलं. त्यानंतरही बाळासाहेबांनी मला पदवीधरचा शब्द दिला. तिथंही कार्यकारिणीनी शब्द फिरवला. अर्ध्या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख असताना मला अपमानकारकरित्या पदावरून हटवलं. शासनाच्या विरोधात जातो म्हणून माझ्यावर डिसेंबर २०२१ मध्ये एमपीडीएची कारवाई झाली. या जिल्ह्यातली सर्वसामान्य जनता, इतर नेते पाठिशी राहिले. पण ज्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, त्या पक्षानं सुटकेसाठी एक निवेदनही प्रशासनाला दिले नाही. याविरोधात माझी मानहानी होईल, अशी कृती केली, असा आरोप बांगर यांनी केला.
वंचितच्या काही नेत्यांनी सक्षम लोकांना पक्षाच्या बाहेर काढण्याचा सपाटा सुरु केल्याचा आरोप बांगर यांनी केला. ते म्हणाले, मी एकटाच नाही तर असे १०० पेक्षा जास्त नेते असे आहेत. यांना बाळासाहेब आंबेडकरांचे समर्थक नाही तर स्वतःचे समर्थक तयार करायचे आहेत. मी जेलमध्ये असताना परिवाराला अपमानास्पद वागणूक दिली. बाळासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी विठ्ठल होते, आजही आहेत. माझी त्यांच्याशी भेट मागच्या आठवड्यात झाली. बाळासाहेबांच्या कानात माझ्याबद्दलच नाही तर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांविरोधात विष ओकण्याचं काम चांडाळ चौकडीने केलेलं आहे. आजही बाळासाहेबांचं विठ्ठलाचं रुप आमच्या मनात आहेत. त्यांचे अनेक भक्त पायाखाली चेंगरलेत. माझं वैर विठ्ठल
पक्षातील बडवे कोण आहेत, हे सांगताना बांगर म्हणाले, ‘ वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रवक्ते फारुक अहमद आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या टीमला स्वतःचं वलय निर्माण करायचंय. त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्याचं काम सुरु केलंय. काम करणारी, बाळासाहेबांसोबत थेट बोलणाऱ्या लोकांना प्रक्रियेतून काढून टाकलं जातं, यांच्या मर्जीतील माणसं पदावरती बसवली जातात….’