आदिवासी समाजाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबध्द, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची ग्वाही

| Updated on: Aug 16, 2021 | 8:33 PM

आदिवासी समाजाला मुलभूत सुविधा व आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. या समाजाचा खऱ्या अर्थाने विकास घडविण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याची भूमिका आज भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेतून मांडण्यात आली.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबध्द, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची ग्वाही
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा
Follow us on

पालघर : पालघरच्या आदिवासी बहुल भागातील आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या विकासाच्या योजना पोहचल्या पाहिजेत. आदिवासी समाजाला मुलभूत सुविधा व आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. या समाजाचा खऱ्या अर्थाने विकास घडविण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याची भूमिका आज भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेतून मांडण्यात आली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली आज पालघरमध्ये जन आशीर्वाद यात्रा पार पडली. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने डॉ. भारती पवार यांच्यावर आदिवासी तसेच समाजातील उपेक्षित घटकांची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी व वंचित समाजाला ताकद देण्यासाठी तसेच या समाजाला विकासाकडे नेण्यासाठी डॉ. भारती पवार व भाजपा नक्कीच कटीबध्द आहेत, असा विश्वास यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. (Bharti Pawar claims central government is committed to the tribal community)

आज भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरवात पालघर जिल्ह्यातील वाघोबा मंदिर, देवखोप येथून झाली. केंद्रीय मंत्री डॉ.पवार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी आमदार मनिषाताई चौधरी, माजी आमदार अशोक उईके, भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष नंदू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालघर शासकीय जिल्हा रुग्णालयाला भेट देण्यात आली. या भेटीमध्ये रुग्णालयाच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

पालघर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना जाब विचारला

पीएम केअर्स फंडामधून रुग्णालयाला कोरोनाच्या काळात 15 व्हेंटिलेटर्स पाठविण्यात आले होते. परंतु त्यामधील एकही व्हेंटिलेटर्स सध्या या रुग्णालायात कार्यान्वित नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या रुग्णालयात आयसीयू विभागही सुरु नसल्याबद्दल त्यांनी रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरर्संना याचा जाब विचारला. रुग्णालयाच्या व्यवस्थेचा आढावा घेताना तेथील रुग्णांची विचारपूस केली. या रुग्णालयात उपचारासाठी येणा-या सर्व रुग्णांवर विशेष करुन आदिवासी समाजाच्या बंधू-भगिनींवर योग्य व वेळेत उपचार करण्याच्या सूचना डॉक्टर्सना दिल्या. तसेच नजिकच्या काळात येथील रुग्णालयासाठी सर्वतोपरी वैदयकीय मदत देण्याचे आश्वासनही डॉ.पवार यांनी दिले.

डॉ. भारती पवारांचं आदिवासी लोकनृत्य

मनोर येथे आदिवासींनी केंद्रीय मंत्रांच्या स्वागतासाठी लोकनृत्य सादर केले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार आणि दरेकर हे लोकनृत्यामध्ये सहभागी झाले. विशेष म्हणजे भरपावसात आदिवासींसोबत डॉ.पवार व प्रविण दरेकर सामील झाले. त्यानंतर पालघर येथील हुतात्मा चौक येथील स्मारकास अभिवादन करुन त्यांनी आदिवासी बांधवांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न जाणून घेतले. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती आदिवासींना देण्यात आली. भर पावसात भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू असताना एका आदिवासी युवकाच्या चहाच्या टपरीवर डॉ.पवार आणि प्रविण दरेकर यांनी चहाचा आस्वाद घेतला. त्या युवकाशी त्यांनी यावेळी संवाद साधला. त्याचे प्रश्न समजावून घेतले. डहाणू येथे जन आशिर्वाद मध्ये सहभागी झाल्या. महालक्ष्मी मंदिरास भेट दिली. तसेच तलासारी येथील वनवासी कल्याण केंद्र येथेही भेट दिली. यावेळी भाजपाचे माजी आमदार पास्कल धनारे यांच्या कुटुंबियांची डॉ.पवार व प्रविण दरेकर यांनी भेट घेतली. (Bharti Pawar claims central government is committed to the tribal community)

आता खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाला न्याय मिळेल

दरेकर यांनी सांगितले की, डॉ. भारती पवार या आदिवासी समाजातील असल्यामुळे येथील जनतेचे प्रश्न समजून घेतले असून त्यांना केंद्रीय स्तरावर न्याय मिळवून देतील असा माझा विश्वास आहे. “मी मंत्री झाली असली तरी मी आदिवासी बांधवांसासाठी आहे”, असा विश्वास देत डॉ.भारती पवार यांनी त्यांनी आज येथील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्याचे स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री असनूही डॉ.भारती पवार यांनी आज आदिवासी बांधावांसोबत संवाद साधला, त्यांच्या व्यथा समजावून घेतल्या. तलासरी येथे यात्रेकरिता जात असताना त्यांनी एका आदिवासी युवकाच्या चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. अतिशय आस्थेवाईकपणे त्या युवकाची विचारपूस केली. त्यांच्या स्वागतासाठी सादर करण्यात आलेल्या आदिवासींच्या नृत्यामध्येही त्या सहभागी झाल्या. विविध ठिकाणी थांबून त्यांनी आदिवासी भगिनिंचे प्रश्न जाणून घेतले. असेही दरेकर यांनी सांगितले.

केंद्रावरील टीकेव्यतिरिक्त राज्य सरकार काही करत नाही- दरेकर

दरेकर पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वाधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत, पण तरीही महाविकास आघाडीकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जाते आहे. कारण राज्य सरकार केंद्रावर टीका करण्यापलीकडे दुसरे काही करू शकत नाही. आज केंद्रीय मंत्री पालघर जिल्ह्यात आहेत. येथील आरोग्य परिस्थिती कशी सुधारता येईल याबद्दल चर्चा करण्यासाठी राज्य प्रशासनाचा एकही अधिकारी आज हजर नाही. केंद्रावर टीका करू शकता पण तुमच्या दारी केंद्रीय मंत्री आल्या आहेत. पण राज्य सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे आज एकही शासकीय अधिकारी उपस्थित नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यावर राज्याच्या अधिकाऱ्यांना न पाठवणे हे राज्य सरकारचे ढिसाळ नियोजन असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

आदिवासी समाजाचे सर्वाधिक मंत्री मोदी सरकारमध्ये

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रा यात्रेला राज्य सरकारचा एकही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, राजशिष्टाचाराचे पालन करणे सर्वाना बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही आज राज्य सरकारचा एकही सरकारी अधिकारी उपस्थित नाही हे बरोबर नाही. मी कालपासून जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज केले. तरीही आज जिल्हाधिकारी तसेच कोणताही अधिकारी उपस्थित नाही, ही खेदजनक आहे. अधिकारी मुद्दाम आदिवासी समाजाला डावलण्याचा प्रयत्न करत असतील तर भाजप कार्यकर्ते याची दाखल घेतल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच जनतेपर्यंत याचा संदेश जाईल असे स्पष्टपणे सांगताना डॉ.भारती पवार यांनी सांगितले की, आज आदिवासी समाजाचे आठ मंत्री मोदी सरकारमध्ये आहेत. त्यातही जास्तीत जास्त मंत्री महिला आहेत. ही देशासाठी गौरवाची बाब आहे.

इतर बातम्या :

VIDEO | केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा आदिवासी बांधवांसह लोकनृत्यावर ठेका

Video : चुकीला माफी नाही, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्याच्या पाठीवर दणका! नेमकं कारण काय?

Bharti Pawar claims central government is committed to the tribal community