मुंबईः मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची जीभ घसरल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलंय. यामुळे मराठा आरक्षण कार्यकर्ते संतापले आहेत. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना सारवासारव करावी लागली. पाटील यांनी तानाजी सावंत यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय आहे, हे सांगितलं.
तानाजी सावंतांची जीभ घसरली, पण त्यांच्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. मराठा समाजाचं आरक्षण हे स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा भाजप-शिवसेना सरकारनं दिलं , ते हायकोर्टात टिकवलं. सुप्रीम कोर्टात टिकवलं…
मग हे (महाविकास आघाडी) सरकार आल्यानंतर त्यांना केस नीट चालवता आली नाही. त्यामुळे रिझर्वहेशन गेलं, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
त्यानंतर मग अडीच वर्ष गेली, त्यात आंदोलनं केली नाहीत. त्यावेळी आम्ही तुमच्या बरोबर राहिलो असतो, असं तानाजी सावंत यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलंय.
उस्मानाबाद येथील हिंदुत्व गर्जना कार्यक्रमात रविवारी तानाजी सावंत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून विरोधक जे टीका करत आहेत, त्यांना टार्गेट केलं. सत्तांतरानंतर विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं.
यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसीमधून पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे, याचा करविता कोण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं…
सावंत यांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरीही त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत.
मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते करत आहेत.