मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना गागाभट्टच शोधावे लागतील : प्रसाद लाड

| Updated on: Dec 26, 2019 | 11:34 AM

कमी आकड्यातला चमत्कार कधी उलटा होईल, कदाचित पूर्ण सरकार बनणार नाही आणि घरी बसायची वेळ येईल, असं प्रसाद लाड म्हणाले

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना गागाभट्टच शोधावे लागतील : प्रसाद लाड
Follow us on

रत्नागिरी : कमी आकड्यातला चमत्कार कधी उलटा होईल हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही, अशा शेलक्या शब्दात भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी टोला लगावला. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता मुख्यमंत्र्यांना गागाभट्टच शोधावे लागणार आहेत, अशा कानपिचक्याही लाड (Prasad Lad on Ministry Expansion) यांनी लगावल्या.

‘कमी आमदार, तरी चमत्कार’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढल्यानंतर आता भाजपकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. कमी आकड्यातला चमत्कार कधी उलटा होईल, कदाचित पूर्ण सरकार बनणार नाही आणि घरी बसायची वेळ येईल, असं प्रसाद लाड म्हणाले. कमी आकड्यात सरकार बनवण्यात किती त्रास होतो, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लवकर कळेल, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता मुख्यमंत्र्यांना गागाभट्टच शोधावे लागणार आहेत. हे सरकार लोकांच्या विकासाच्या आड येणारं असल्याची टीकाही प्रसाद लाड यांनी केली.

‘यू टर्न’ आता ‘उद्धव ठाकरे टर्न’ नावाने ओळखला जाईल : चंद्रकांत पाटील

30 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार झाला तर जनतेने धन्यता मानावी, असं लाड म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्यासोबत शिवसेनेला रहावंच लागेल, त्यामुळे सत्तेसाठी लाचार किती व्हायचं, हे आता शिवसेनेने ठरवावं असं सांगायला प्रसाद लाड (Prasad Lad on Ministry Expansion) विसरले नाहीत.

मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वोकृष्ट साखर कारखाना पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं गुणगान गायलं होतं. कमीत कमी आमदार, तरी राज्यात चमत्कार, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोलाही लगावला होता.